डोंगर… आपत्तीचा, दुःखांचा आणि आव्हानांचाही

माळीण… नुसता शब्द जरी नुसता कानावर पडला तरी काळजाचा थरकाप उडविणारी महाभयानक घटना डोळ्यासमोर उभी राहते. कधी काळी माळीण नावाचं छोटंसं टुमदार गाव इथं वसलेलं होतं, यावर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वासही बसणार नाही, इतकी भीषण हानी या गावाची झाली आहे. कधीही भरून न येणारं नुकसान आहे. घटनेचं वर्णन करण्यासाठी भीषण आणि भयाण हे शब्द अपुरे पडतील, इतकी अवघड परिस्थिती आहे. अलिकडच्या काळात निसर्गाच्या रुद्रावताराचा मानवी जीवनाला बसलेला सर्वाधिक मोठा फटका म्हणजे माळीण असं मला वाटतं.  Satalite-image   10362619_10204072602993252_2135784327786748095_n

संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं नवी दिल्लीत होतो. माळीणच्या दुर्घटनेची माहिती कळताच राजधानीतच महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांना दुर्घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून दिली. माननीय पंतप्रधानांनी राजनाथसिंह यांना तातडीनं माळीणच्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या सूचना दिल्या.

10169176_10204643856439266_4879685879513590795_n

नवी दिल्लीत हे सगळं सुरू असताना माझं सगळं लक्ष माळीणकडे लागलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात अनेकदा या गावात या ना त्या निमित्तानं जाणं झालं. माझा आणि माळीणचा अगदी ऋणानुबंध निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती काय असेल आणि नेमकं काय झालं असेल, हे जाणून घेत होतो. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक तसंच कार्यकर्त्यांना तातडीनं दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याला हातभार लावण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक शिवसैनिक आदेशाची वाट न पाहता आधीच दुर्घटनास्थळी रवाना झाले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सर्वप्रथम माळीण गावात दाखल झाले होते. तेव्हा ‘एनडीआरएफ’चे जवान किंवा प्रशासनाचे अधिकारीही तिथं पोहोचले नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीनं मदतकार्य सुरू केले होते. शिवसैनिक आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं मला खूप कौतुक आणि अप्रूप वाटतं. कोणतीही आपत्ती कोसळली, की मंडळीच सर्वाधिक आधी तिथं पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात. दुपारनंतर ‘एनडीआरएफ’चे जवान माळीणमध्ये दाखल झाले. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि संघ स्वयंसेवक काम करू लागले.

1602098_868960169800569_1721092214454791634_o

नवी दिल्लीत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांशी सातत्यानं माझी चर्चा सुरू होती. सतत कोसळणारा पाऊस, गावातील ठप्प झालेला वीजपुरवठा यामुळं रात्री दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देणं शक्य नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माळीणमध्ये दाखल झालो. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथसिंह, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि इतर काही नेतेमंडळी सोबत होती. राजनाथसिंह यांनी माळीण गावची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘इथं एक गाव वसलेलं होतं, यावर विश्वासच बसत नाही,’ हे त्यांचं वक्तव्यामध्येच सगंळ काही सांगून गेलं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं राजनाथसिंह यांचं हृदयही हेलावलं. केंद्राच्या वतीनं तातडीनं दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येईल, याची त्यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणं राज्यानं केंद्राकडे गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन गावाच्या पुनर्वसनाची मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदल्या दिवशीच, म्हणजे दुर्घटनेच्या दिवशी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. काळाचा घालाच इतका महाभयानक होता, की आर्थिक मदत, दिलासा, मदतीचे हात या सगळ्यांच्या पलिकडं परिस्थिती पोहोचलेली होती. तरीही केंद्र सरकार आमच्या पाठिशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. ते या निमित्तानं झालं. राजनाथसिंहांच्या नंतर दुपारी मग माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीनंतर मग राज्यानं दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अर्थात, राज्याच्या मदतीमध्ये ७५ टक्के वाटा केंद्राचाच असतो. त्यामुळं केंद्रानं माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी भरभरून दिलंय आणि इथून पुढं देखील लागेल ती सर्व मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, हे मी इथं आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.

10499421_868962049800381_3891409029198393984_o

माळीणच्या दुर्घटनेमुळं कोसळलेला दुःखाचा आणि आव्हानांचा डोंगरच इतका मोठा होता, की त्याची कारणं काय, कशामुळं हे सगळं झालं, दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. कदाचित अजूनही आपण चर्चा करण्याची ही वेळ नाही. भूवैज्ञानिक, पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि संबंधित अभ्यासू मंडळी यावर सखोल संशोधन करून योग्य तो निष्कर्ष काढतील. आपण त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेच्या निमित्ताने माझ्यावर निशाणा साधून टीका केलीच. मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे तसंच वळसे-पाटलांचं झालेलं दिसतंय. त्यांना प्रत्येक ठिकाणी शिवाजीदादाच दिसतो वाटतं.

विनाकारण त्यांनी माझ्यावर टीका केली. मला वादात पडायचं नाही. आणि दुर्घटनेच्या संकटामध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांचा अवमान करायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, की पडकईची कामं करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही पडकईची कामं मनुष्यबळाच्या माध्यमातून झाली असती, तर ते अधिक योग्य झालं असतं.

Malin

आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून उपस्थित करावासा वाटतोय. खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगात दावे नि प्रतिदावे करत बसण्याची माझी इच्छा नाही. मात्र, समोरच्याला हे समजत नसेल तर मी तरी काय करणार. त्यामुळंच फक्त अजून एक उल्लेख करतो. माळीणच्या मदतीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा डिंभे चेकनाका पास केल्यानंतर अडिवरे गावाजवळ पोलिसांनी माझ्या गाडीसह माझ्यासोबतच्या तीन गाड्या अडवल्या. नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल अरुण गिेरे हे माझ्यासोबत गाडीमध्येच होते. पोलिसांनी अरुण गिरे यांना गाडीतून उतरविले. मी माळीणला जाऊन परत येईपर्यंत अरुण गिरे यांना पोलिस बंदोबस्तात तिथेच म्हणजेच अडिवरे गावातच थांबवून ठेवण्यात आले. अरुण गिरे शिवसेनेत आल्याचा धसका दिलीप वळसे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अरुण गिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी अवघड परिस्थिती झालेली दिसतेय. त्यामुळंच ते प्रत्येक ठिकाणी सूडबुद्धी वापरत आहेत.

मला या पोलिसांचं मोठं आश्चर्य वाटतं. तुम्ही पोलिस आहात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिपाई आहात? पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही चालता की दिलीप वळसे-पाटील यांच्या तालावर तुमचा कारभार चालतो? अरे, आंबेगावसह शिरूर मतदारसंघात कायद्याचे राज्य आहे की कुणा एकाची हुकुमशाही आहे? वेळीच सुधारा. राज्यातही पुढचं सरकार आमचं आहे आमचं.

बरं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंबेगावात वेगळा न्याय लावण्याची पद्धत दिसतेय. एकीकडे शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चाळीस-चाळीस गाड्या कोणतीही तपासणी न करता आणि न अडविता सोडल्या जात आहेत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची, खासदाराची गाडी अडविण्याची हिंमत पोलिसांमध्ये येतेच कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना वेगळा न्याय हा कोणता कायदा आहे, याचे उत्तर संबंधितांनी देण्याची आवश्यकता आहे.

‘पडकई’च्या चौकशीला वळसे-पाटील दचकतात का?

  • महाकाय यंत्रसामुग्री वापरून पडकईची कामं केल्यामुळंच ही दुर्घटना झाली का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
  • अशी काय महाकाय आणि जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री वापरली, की पडकईच्या कामांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला, याचा तपास व्हायला पाहिजे.
  • पडकईचे नाव निघताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील एकदम दचकतात का? आणि बॅकफूटवर का जातात? त्यांचे पडकईच्या कामात काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, यावर प्रकाश पडला पाहिजे.
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर हे माझी गाडी अडवून ‘पडकईबाबत बोलू नका. लोक नाराज होतील,’ असं मला सांगतात. काय बोलायचं आणि काय नाही, हे मला सांगणारे विजय मगर कोण. मुळात एका लोकप्रतिनिधीची गाडी अडविण्याचे अधिकार यांना कोणी दिले? काय बोलायचं आणि काय नाही, हे सांगणं पुढची गोष्ट झाली. कोणाच्या तालावर हे नाचताहेत? हा सगळा काय झोल आहे?
  • फक्त पोलिसांमार्फत नाही, तर सीआयडीच्या मार्फत पडकईच्या सर्व कामांची आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी ठाम मागणी आहे.

10556509_10204072604913300_2966336670619223850_n

पुनर्वसनाचे काम वेगाने व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. खचलेल्या मनांना आणि फक्त शरीरानं जिवंत असलेल्या गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचा निवास, भोजन, कपडे तसंच इतर सर्व गोष्टींची व्यवस्था ‘डायनालॉग इंडिया लिमिटेड’ कंपनी आणि ‘भैरवनाथ पतसंस्थे’मार्फत करण्यात येत आहे. गावातील पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदतनिधी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरूच आहे. कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या रुपानेही मदत मोठ्या प्रमाणावर येते आहे.

दुर्घटनेमुळं झालेलं नुकसान आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर यातून आपल्याला पुन्हा उभं रहायचं आहे. गावकऱ्यांना उभं करायचं आहे. त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे. आपण सर्वांनी शिवसेनेच्या मदतकेंद्राला भरघोस मदत करून माळीण गावाच्या विकासासाठी आणि आपत्तीग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लिहिण्यासारखं बरंच आहे. पण आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच…

अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…

तुही यत्ता कंची…

‘शिक्षण हे असे एकमेव जबरदस्त शस्त्र आहे, की ज्यामध्ये सारे जग बदलण्याची क्षमता आहे.’

दक्षिण आफ्रिकेचे महान सुपुत्र डॉ. नेल्सन मंडेला.

‘शिक्षण म्हणजे तुम्ही काय काय जाणता. पुस्तकात काय आहे, ते माहिती असणे म्हणजे शिक्षण नव्हे.’

अनुभवातून मिळते, तेच आयुष्यातील खरे शिक्षण.

इजिप्तमधील सुप्रसिद्ध विचार

ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव.

आइनस्टाइन

तुम्ही म्हणाल, दादांनी आज हे काय सुरू केलंय. पण मुद्दामच मी आज हे लिहिलंय. अनेकांना सत्तेची मस्ती येते. काहींना पैशाची मस्ती येते. काही जणांना त्यांच्या ताकदीची किंवा सौंदर्याची मस्ती येते. तशीच आपल्या इथल्या काही जणांना शिक्षणाची मस्ती आलीय, असं वाटतंय. पदवीपर्यंत शिक्षण घेणारे काही जण माझं शिक्षण किती झालंय, असा प्रश्न विचारताहेत.

मुळात जेव्हा निवडणुकीत मुद्दे नसतात किंवा उमेदवारानं काहीच कामे केलेली नसतात. तेव्हा असे गैरलागू मुद्दे आणि फालतू प्रश्न विचारण्याची आफत काही जणांवर येते. तुम्हाला तुमच्या पदवीचा इतकाच गर्व झाला असेल, तर तो तुमच्यापाशीच ठेवा. दुसऱ्याचं शिक्षण आणि दुसऱ्याचा अनुभव याबद्दल अपशब्द काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

अनेक जणांना वाटतंय, की मी एका रात्रीत उद्योगपती झालोय. आरोप करतायेत, की मी शेतकऱ्याचा मुलगा नाहीये. मी पण सर्वांसारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलाच आहे. इतरांसारखी गुरं चरायला नेलीयेत. गुरं राखलीयेत. मोटं हाकलीय. विहिरीवरून घरात पाणी आणलंय. शेतीची कामंही केलीयेत. अगदी गवतही कापलंय. जन्माला आल्या आल्या काही मी उद्योगपती बनलो नाहीये. माझं जीवन पण इतर सर्वांसारखंच खडतर आणि अवघडच राहिलंय. तुम्हाला उद्योगपती आढळराव दिसतायेत. पण तुम्ही माझी आत्मकथा वाचली नसल्यामुळं शेतकरी आढळराव, भाजीविक्रेता आढळराव, पेपर टाकणारा आढळराव, डोअरकिपर आढळराव, शिपाई आढळराव आणि इतर कष्टाची नि मेहनतीची कामं करणारा आढळराव दिसत नाही. माझ्या आयुष्याची सगळी कथा ‘अनाहत’मध्ये मी सविस्तरपणे मांडलीय.  अनेकांनी ते वाचलीही आहे. पण ज्यांनी ते वाचलेलं नाहीये, त्यांच्यासाठी ते पुन्हा एकदा सांगतोय.

लहानपणी आमचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर तिथं अहोरात्र मेहनत घेतली. अत्यंत खडतर परिस्थितीत घर चालविण्यासाठी खूप कष्ट सोसले. मंडईत वडिलांना मदत करण्यासाठी भाजी विकली. आंब्याच्या पेट्या वाहिल्या. पण शिक्षणावरील श्रद्ध ढळू दिली नाही. सकाळी मंडईत भाजी विकायची नि रात्री शाळेत शिकायचं, असा माझा उपक्रम सुरू असायचा. मग वडील गावी परतले आणि मी मुंबईतच राहिलो. हाती नोकरी नाही. रहायला घर नाही, तरी डगमगलो नाही. मुंबईत प्रसंगी झोपडपट्टीत राहिलो, मिळेत तिथे आसरा घेतला. पण कष्ट आणि शिक्षण हे सुरूच होतं. कधी पेपरची लाइन टाकली, कधी डोअर किपरचं काम केलं, प्रिंटिंग प्रेसमध्ये हेल्पर म्हणून कामाला लागलो. दिवसभर कष्ट सुरू असतानाही शिक्षण कधी सुटलं नाही.

‘झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये शिपाई म्हणून कामाला लागलो. पण तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. शिक्षणाप्रमाणेच इतर गोष्टींचं ज्ञानही आपल्याला हवं, म्हणून टायपिंगचा क्लास लावला. इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला. वेळप्रसंगी रस्त्यावर राहिलो, पण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचण्याचा नियम चुकविला नाही. झेनिथमध्ये काम करीत असतानाच कोल्हापुरात शिवाजी युनिव्हर्सिटीत पी. डी. आर्टला बहिस्थ म्हणून प्रवेश घेतला. फक्त तीन महिन्यात सर्व अभ्यास पूर्ण करून परिक्षा दिली. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण तर झालोच, पण कोल्हापूर सेंटरमध्ये इंग्रजी विषयात सर्वप्रथम आलो.

004

मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला उद्योगपती नाही. शेतकरी कुटुंबातच जन्मलो पण कष्टानं आणि स्वकर्तृत्वानं उद्योगपती बनलोय आणि मला त्याचा अभिमान आहे. आयुष्यात दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या. वाचत राहिलो. इंग्रजी पेपर, इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी साहित्य वाचत राहिलो. कष्ट करीत राहिलो. कोणतंही काम करण्याची कधी लाज बाळगली नाही आणि तिसरं म्हणजे नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहिलो.

भारतात कम्प्युटर अजून यायचा होता. महाराष्ट्रातल्या उद्योजकांबरोबर जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि कोरिया दौऱ्यावर गेलो होतो. तिथे जे काही पाहिलं होतं, माहिती घेतली होती ‘मायक्रोप्रोसेसर ट्रेनर सिस्टीम’ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. तसं पाहिलं तर तेव्हा ती मोठी रिस्कच होती. पण मी ती घेतली. अनेकदा इंजीनिअर मंडळींसोबत काम केलं. काही वेळा त्यांच्या डिझाईनमध्ये सुधारण सुचविल्या. त्या मंडळींनीही योग्य त्या सूचना मोठ्या मनानं स्वीकारल्या. इंजीनिअर किंवा एमबीए नसतानाही अनुभवामुळं मी व्यवसायात स्थिरावलो आणि आज ‘डायनॉलॉग’ जगातील प्रमुख कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते आहे. दूरदृष्टी होती, म्हणूनच मी तेव्हा या व्यवसायात शिरलो. परंपरागत व्यवसाय निवडला असता, तर आज कुठं असतो माहिती नाही. शिक्षमामुळं ज्ञान मिळतं आणि समाजात वावरल्यामुळं दृष्टीकोन प्राप्त होतो. तो मला झाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उदयोगपती झालाय. आजच्या घडीला ‘डायनॉलॉग’मध्ये आज शेकडो इंजीनिअर्स आहेत.

उद्योगपती झालो, तरी पाय जमिनीवरच आहेत. कोणाच्याही घरी जातो. शेतकऱ्याच्या घरी चटणी-भाकरी खातो. चहा-नाष्टा घेतो. मायमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतो. त्यामुळं मी उद्योगपती असलो किंवा कोणीही असलो, तरी त्याचा रोजच्या जगण्यावर अजिबात फरक पडलेला नाही. मी आधी होतो तसाच आजही आहे. माझं काम आणि प्रचारही निवडणुकीपुरता नसतो. निवडणूक आली, की फोटो काढून फेसबुकवर टाकायचे धंदे मी करीत नाही. निवडणुकीपुरती लोकांची कामं करीत नाही. निवडणुकीपुरता जनतेत मिसळत नाही.

0023

गेली अनेक वर्ष लोकांमध्ये आहे. रोज सकाळी उठून लोकांच्या गाठीभेटी घेतोय. आदिवासी पाड्यांवर जाऊन लोकांच्या समस्या, वेदना जाणून घेतोय. कधीकधी सकाळी सात वाजता सुरू होणारा माझा दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतो. पाऊस, थंडी आणि ऊन काहीही असो. माझ्या नित्यक्रमात कधीही फरक पडलेला नाही. लोकांना भेटल्याशिवाय मला चैनच पडत नाही.

त्यामुळं शिक्षण आणि कामांचा हिशेब तुम्ही मागू नका. मी कोण आहे आणि काय आहे, हे जनतेला माहिती आहे. मी कायम तुमच्या सोबत होतो आणि यापुढेही राहील. त्यामुळंच जनतेनं मला पहिल्या वेळी वीस हजारांनी निवडून दिलं आणि दुसऱ्यांदा एक लाख ८० हजारांपर्यंत माझ्या विजयाचं मार्जीन वाढवलं. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा माझ्या मतदारांवर. इतरांनी त्यामध्ये लुडबूड करण्याची आवश्यकता नाही.

विकासकामे आणि प्रचाराचे मुख्य मुद्दे बाजूला सारून गैरलागू मुद्दे पुढे करणाऱ्यांना विचारावेसे वाटते, बाबारं, ‘तुही यत्ता कंची…?’

‘मनीलाइफ’ मासिकात छापून आलेली दादांची मुलाखत वाचण्यासाठी यावर क्लिक करा…

पाच वर्षांतील खणखणीत पाच…

  • –    पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री असताना सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, हा मार्ग फायदेशीर ठरणारा नाही. तोट्यात चालणारा आहे, हे समजून त्यांनी तो प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता. मी खासदार झाल्यानंतर त्या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ममता बॅनर्जी यांना भेटलो. सुरुवातीला रेल्वे खाते हे तृणमूल काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांना भेटणे आवश्यक होते. त्यांना या रेल्वेमार्गाचे महत्त्व समजावून सांगितले. अखेरीस पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी १८३९ कोटी रुपयांचा निधी २०१२ मध्ये मंजूर करण्यात आला. एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांना नियोजन आयोगाची संमती लागते. सध्या हे प्रकरण नियोजन आयोगाकडे प्रलंबित असून त्यांच्या मान्यतेनंतर पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला गती येईल.
  • –    दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर मी खेड-सिन्नर मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. २००९ पासून तो विषय माझ्या डोक्यात होता. जवळपास सोळाहून अधिक वेळा बैठका झाल्या. मंत्री महोदय, सचिव, अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. कार्मिक खाते, भूसंपादन खाते आणि विविध संबंधित खात्यांबरोबर बैठका झाल्या. पाच वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर महिन्याभरापूर्वी या रस्त्यासाठी १४५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • –    कल्याण ते नगर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्यासारखा आहे. अनेक अपघात आणि अनेक बळी हीच या रस्त्याची ओळख बनली आहे. हे टाळण्यासाठी मी २०१० सालापासून माळशेज घाट ते अणे घाट रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न केले. सुमारे १६१ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २९३ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल. मुख्य म्हणजे या रस्त्याला कोणत्याही स्वरुपाचा टोल असणार नाही. त्यामुळे वाहनचालकांची लूट या रस्त्यामुळे होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
  • –    पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत खेड आणि शिरुर या मतदारसंघांमध्ये सर्वानिधी निधी आणण्यात मी यशस्वी झालो आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदाराने माझे आव्हान स्वीकारावे. त्यांच्या मतदरासंघात जर अधिक निधी नेण्यात ते यशस्वी झाले, असतील तर दाखवून द्यावे. मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा निधी आणण्यात मला यश आले आहे.
  • –    हडपसर ते कवडीपाट या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तीन वर्षे झगडलो. वेळप्रसंगी भांडलो सुद्धा. केंद्रीय मंत्र्यांबरोबर भांडलो. शाब्दिक चकमक उडाली. पण अखेरीस सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता ५० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.

तेलंगण आंदोलनाचा त्रास नि मनस्ताप

तेलंगणमधील मतांवर डोळा असलेल्या काँग्रेसला दहा वर्षांपूर्वीचे आश्वासन पूर्ण करण्याची फार घाई झाली होती. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करून, सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि बंद दरवाज्याच्या आतमध्ये तेलंगण हे नवे राज्य जन्माला घालण्याची प्रक्रिया काँग्रेसने पार पाडली. लोकशाहीचा गळा घोटला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासली. इतके सारे नाटक करून वेगळ्या तेलंगणची निर्मिती करून काँग्रेसने काय साध्य केले. मुळात वैयक्तिक माझा आणि शिवसेना पक्षाचा तेलंगणच्या निर्मितीला विरोधच होत आणि यापुढेही राहील. अशा प्रकारे राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून भावाभावांमध्ये भांडणे लावण्याची आवश्यकताच काय? त्यामुळेच संयुक्त आंध्र प्रदेशच्या बाजूने आम्ही आहोत.

Tirupati-Balaji-temple

तेलंगणचा विषय निघाला म्हणून सहज आठवलं. तेलंगण आणि सीमांध्र यांच्या आंदोलनांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय. घेतलाय म्हणजे काय अगदी चांगला लक्षात सुद्धा राहिलाय. असेल साधारण सहा-आठ महिन्यांपूर्वीची घटना. वेगळ्या तेलंगणच्या आंदोलनाने तेव्हापासूनच अधिक जोर धरलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमांध्रमधील नागरिकही रस्त्यावर उतरले आणि त्यांनीही संयुक्त आंध्र प्रदेशसाठी जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनांचा फटका तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना कसा बसतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय.

सहाएक महिन्यांपूर्वी मी तिरुपतीला गेलो होतो. दर्शनासाठी. अगदी व्यवस्थित दर्शन करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघून दुपारपर्यंत बेंगळुरूला पोहोचणार होतो. चित्तूर-पालमनेर-मुलबागल या मार्गाने आम्ही जाणार होतो. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासून नेमका सीमांध्रातील नागरिकांनी रास्ता रोको पुकारला होता. तरीही आम्ही सकाळी पाचच्या सुमारास निघालो. तिरुपती रोडवरून हायवेवर आल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अंदाज हळूहळू येऊ लागला. जागोजागी रास्ता रोको सुरू होते. सकाळची वेळ असल्यामुळं अजून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या नव्हत्या. पण तरीही रांगा लागायला सुरूवात झाली होती.

Tirupati Balaji Photo

पहिल्या रास्ता रोकोच्या ठिकाणी आम्हाला अडविलं. मला चांगलं आठवतंय, पालमनेर नावाचं गाव होतं ते. थोडा वेळ थांबल्यानंतर एक रुग्णवाहिका तिथं आली. आंदोलकांनी रुग्णवाहिकेला सोडलं. आमच्या ड्रायव्हरनं शिताफीनं त्यामागून गाडी घुसविली आणि पहिल्या रास्ता रोकोचा अडथळा आम्ही पार केला. मात्र, वीस-पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या रास्ता रोकोला आम्हाला सामोरे जावे लागले.  झालं, इथंच दोन-तीन तास काढावे लागणार, अशा विचारात आम्ही सर्व होतो. तेवढ्यात पाच-दहा मिनिटांनी आठ-दहा तरुण बाईकवरुन तिथं आले. त्यांनी आम्हाला विचारलं, की गावागावांतून तुम्हाला पुढच्या रस्त्यापर्यंत नेतो, आम्हाला चारशे रुपये द्या. सुरुवातीला मला हे थोडं ऑड वाढलं. मी पुण्याजवळील शिरुरचा खासदार आहे, असं सांगूनही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. पैसे हवेच अशी त्यांची भूमिका होती.

शेवटी काय आम्हालाली लवकर बेंगळुरूला पोहोचायचं होतं. त्यामुळं आम्ही तरुणांची ऑफर स्वीकारली. फक्त आम्ही एकटेच नाही, तर आणखी तीन-चार वाहनचालकांनाही त्यांनी पटविलं होतं. चारशे रुपये त्यांच्या हातावर टेकविले. मग त्या तरुणांनी आम्हाला गाडी वळवून घ्यायला लावली आणि थोडं मागं जाऊन एका फाट्यावरून आमच्या गाड्या आत वळल्या. अगदी छोट्या छोट्या खेड्यातून, पाड्यांमधून आमच्या गाड्या जात होता. रस्ते अगदी छोटे छोटे. खडबडीत आणि ओबडधोबड. साधारण तास दीडतास प्रवास केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला पुढच्या रस्त्यावर नेऊन सोडलं.

Tirupati- Map

त्या रस्त्यावरून थोडा प्रवास करुन पुढं गेल्यानंतर पुढचा रास्ता रोको होताच. तिथंही बाईकवाल्या तरुणांचं तसंच टोळकं हजरच होतं. आम्ही त्या तरुणांच्या पाठीमागून आलोय, हे पाहिल्यानंतर जे समजायचं होतं, ते त्यांना समजलं. मग त्यांनी पुन्हा आम्हाला पुढचा रस्ता दाखवायची ऑफर दिली आणि आमच्याकडून आधीच्याच रेटप्रमाणे चारशे रुपये घेतले. सीमांध्रचे आंदोलन म्हणजे त्या तरुणांचा धंदाच झाला होता. कदाचित आंदोलकांपैकीच काही तरुण हे तोडपाणी करीत असावेत. कोणास ठाऊक. पुन्हा तशाच आडवाटा, छोटीछोटी गावं, धुरळा उडणारा बारीकसा रस्ता आणि निष्कारण वाया जाणारा वेळ. तासाभरानंतर मग आम्हाला मोठा रस्ता मिळाला. नंतर थोड्यावेळानं पुन्हा त्याच नाटकाचा तिसरा खेळ झाला आणि शेवटी आम्ही कर्नाटक बॉर्डरजवळ येऊन पोहोचलो. मग तिथून पुढं आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.

सकाळी पाचाला निघालेलो आम्ही एरव्ही पाच तासात सहजपणे बेंगळुरूला पोहोचलो असतो. म्हणजे सकाळी दहा अकराच्या सुमारास. पण या सीमांध्र आंदोलनाच्या गडबडीत आमचा हाकनाक वेळ गेला. संध्याकाळचे पाच वाजले आम्हाला पोहोचायला. म्हणजे तब्बल बारा तास. मला सांगा, तिरुपतीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांचा वेगळा तेलंगण आणि संयुक्त आंध्र प्रदेश यांच्याशी दुरान्वये तरी संबंध आहे का? पण त्या सामान्य भक्तांना विनाकारण त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. सीमांध्र इतक्या सगळ्या आंदोलकांसमोर आपण बोलून किंवा त्यांना समजावूनही काही फायदा नसतो.

तेव्हा सरकारनंही कायदे करताना ते लवकरात लवकर कसे संमत होतील, याचा विचार केला पाहिजे. कारण कायदे होतात, मात्र, ते होत असताना सामान्यांना त्याचा फटका बसतो. शिवाय ज्यांचा त्या प्रदेशाशी किंवा घटनेशी सूतराम संबंध नाही, त्यांना उगाचच त्रास. म्हणजे सरकार कायदे करण्याचे वायदे करतं आणि फायदे मात्र, ही असली इरादे नेक नसलेली दलाल मंडळी उकळतात.

अनेकदा लोकांना वाटतं, की हे खासदार आहेत. त्यांना काहीच त्रास नाही. फक्त गाडीत बसायचं आणि फिरायचं. पण दिसतं तसं नसतं. खासदार असलो तरीही सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही कधीकधी खूप त्रास सहन करावा लागतो. तेलंगणच्या निमित्तानं हे सहज आठवलं म्हणून आपल्याशी शेअर केलं.

जय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र  

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ब्लॉग या नव्या माध्यमाच्या विश्वात पहिलं पाऊल टाकताना आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विषयाशिवाय आणखी कोणता विषय समर्पक असू शकतो, असं आपलं मला सहज वाटलं. आम्हाला नव्याच्यी कास धरायची आहे. अगदी जरुर धरायची आहे. मात्र, हे करताना आम्ही आमची संस्कृती आणि प्रथापरंपरांना फाटा देऊ शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळंच माझा पहिला ब्लॉग हा माझ्या लाडक्या सर्जा-राजासाठी…

Image

बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालं बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठून आणि पुन्हा सुरू होऊन. राज्य सरकारनं ऑगस्ट २०११ मध्ये सर्क्युलर काढून बैलगाडा शर्यतींवरील बंदी म्हणजे कोणताही सारासार विचार न करता घेतलेला मोगलाई निर्णय होता. नंतर हायकोर्टातही ही बंदी काय राहिली. मात्र, उत्साही गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचे सुरूच ठेवले. त्यामुळे गावागावांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. सर्वसामान्य शेतकरी त्यामुळं नाडला गेला. शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत, अशा पद्धतीनं भाषणे ठोकायची. मात्र, त्याच शेतकऱ्याला कसा त्रास होईल, यासाठी सर्क्युलर काढायचे. व्वा.. रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

काय झालं या बंदीमुळं. शेतकऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या माथी लागले. मुळात अशी बंदी घालण्याची काही आवश्यकताच नव्हती. कारण कोणत्याही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, तो स्वतःपेक्षा त्याच्याकडील पशुधन अधिक प्रेमाने जपतो. त्यांची स्वतःच्या जिवापेक्षा अधिक काळजी घेतो. वेळप्रसंगी तो स्वतः उपाशी राहिल, पण आपल्या गायी-बैलांना चारा दिल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. पोटच्या पोरासारखा तो जनावरांना जपत असतो. त्यामुळं बैलगाडा शर्यतींमुळं बैल जोड्यांवर अन्याय, अत्याचार होईल, ही धारणाच चुकीची आहे.

पण ‘व्हाइटकॉलर’ म्हणजेच पांढरपेशा मंडळींच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. शेतकऱ्यांच्या आनंदावर, त्याच्या मनोरंजनावरच बंदी आली. मग गावोगावच्या यात्रा ओस पडू लागल्या. यात्रेमुळे पोट भरणारे वाजंत्रीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक आणि जत्रेत सहभागी होणारे विक्रेते यांचा रोजगारच बुडाला. पण आम आदमीच्या सोबत आमचा हात आहे, अशा गप्पा ठोकणाऱ्यांनी त्यांच्याच पोटावर पाय आणला होता.

पांढरपेशा समाजाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही लढा उभारला. नाही, ही बंदी आम्ही खपवून घेणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढू, असे सर्वांनी ठरविले. कधी रास्ता रोको केला. झोपी गेलेल्या राज्य सरकारकडे बैलगाडा मालकांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. बैलगाडा मालक आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.  बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर होते, आबा शेवाळे होते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथले बैलगाडा मालक होते. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली.

आम्ही आमच्या पोरांपेक्षा अधिक प्रेम हे गायीबैलांवर करतो, हे सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पटवून दिलं. शेवटी त्यांनाही आमचे म्हणणे पटले आणि सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेतली. शेतकरी बैलांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे हाल करीत नाही, हे न्यायमूर्तींना पटले. आमच्या लढ्याला निर्भेळ यश आल्यामुळं मला वैयक्तिकपणे खूप आनंद झाला. माझ्या बळीराजासाठी मी काही करु शकलो, अशी भावना खूप सुखावह होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानंच परवानगी दिल्यामुळं पुन्हा एकदा गावागावांमधून भिर्रर्रर्रर्रर्रर्र… चा आवाज घुमू लागला आणि बैलगाडा शर्यती भरू लागल्या.

(वृत्त आणि व्हिडिओ पाहाः http://bharat4india.com/mediaitem/1466-top-news)

माघी पौर्णिमेच्या निमित्तानं गावागावांना भेटी देत फिरत होतो. तेव्हाही बैलगाडा शर्यतींमुळं बळीराजाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बैलगाडा शर्यतींमुळं गावांचं हरवलेलं गावपण पुन्हा एकदा मिळालं. गावात चैतन्य आलं. उत्साह आला. जल्लोष आला. सारे श्रेय बैलगाडा मालकांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचे होते. मी फक्त निमित्त मात्र. त्यांच्यासोबत होतो इतकंच. पण आमच्या यशाचे श्रेय लाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शेतकरी राजा सूज्ञ आहे. त्याला आपले कोण आणि परके कोण हे चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळंच अशा श्रेय लाटणाऱ्यांबद्दल शब्द वाया न घालविलेलेच बरे.

मुळात मला अनेकदा वाटतं, की ही पांढरपेशी मंडळी फक्त बैलगाडा शर्यतींनाच का टार्गेट करतात. म्हणजे बैलगाडा शर्यती या देशभरात भरविल्या जातात. किला रायपूरच्या ग्रामीण ऑलिंपिकमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते. तमिळनाडूत पोंगलच्या सणानिमित्त ‘जालिकट्टू’चे आयोजन होत असते. कर्नाटकातही बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता प्रचंड आहे. इतकेच काय तर आपला शेजारी असलेल्या बांग्लादेशामध्येही बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद मिळतो. इतक्या सर्वदूर जर बैलगाडा शर्यतींना प्रतिसाद मिळत असेल तर या पांढरपेशा मंडळींच्या डोळ्यात का खुपते देव जाणे.

एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी ही मंडळी करतात. पण दुसरीकडे अश्वशर्यतींवर हीच मंडळी पैसै लावतात. घोड्यांच्या शर्यतींमुळे त्यांचे हाल होत नाहीत का. पोलोसारखा किंवा इक्वेस्ट्रियन या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो. त्या खेळांवर बंदी आणावी, म्हणून कोणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग सामान्य शेतकऱ्याला आनंद मिळवून देणाऱ्या बैलगाडा शर्यतीच टार्गेट का.

त्यांना कोणी वाली नाही, अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायमच उभा होतो, आहे आणि राहीन. मग ते बैलगाडा शर्यतींचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारी कोणतीही समस्या असो. शिवाजीराव आढळराव पाटील कायम त्यांच्या सोबत असेल. फक्त पाठिशी थांबणार नाही. तर त्यांच्यासोबत रस्त्यावरही उतरेन.

येळकोट येळकोट… जय मल्हार…