निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी बैलगाड्यावर

दहा-दहा वर्षे गायब असलेले नेते झळकले फ्लेक्सवर

IMG_1894

लोकसभा निवडणूक जवळ आली, की सगळेच जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आसुसलेले असतात. कोणी दहा-बारा वर्ष गायब असतात आणि एकदम फ्लेक्सवर अवतरतात. तर कुणी अगदी निवडणुकीच्या तोंडावर शत्रूला जाऊन मिळतो आणि राजकीय रंगमंचावर अवतरतो. चार साडेचार वर्षे हे सर्व झोपलेले असतात आणि निवडणुकीच्या मोसमात समोर येतात. बेडकं परवडली किमान दरवर्षी पावसाळ्यात तरी दर्शन देतात. पण हे राकारणी फक्त निवडणूक ते निवडणूकच दिसतात. अशी ही निवडणुकीची गंमत आहे.

अनेकांना खासदार व्हायचे डोहाळे लागले आहेत. दहा-पंधरा वर्ष गायब असलेली मंडळी मला प्रश्न विचारत आहेत, की मी गेली पंधरा वर्ष काय केलं. मी काय केलं हे जनलेताल ठाऊकच आहे. पण तुमचं काय? तुम्ही लोकांसाठी काय केलं ते तरी कळू द्या लोकांना. लेकांनो, तुम्ही जर गेली पंधरा वर्षे राजकारणात सक्रिय असता, तर हा प्रश्न विचारायची वेळच आली नसती. फक्त डोळे उघडे ठेवले असते तरी तुम्हाला समजलं असतं.

जो उठतो तो मला प्रश्न विचारतोय. याचं काय केलं, त्याचं काय झालं. रेल्वे कधी सुरू होणार. बैलगाडा शर्यती कधी चालू होणार वगैरे वगैरे. सगळे प्रश्न मलाच. अर्थात, एक बरंय. शेवटी वर्गातही शिक्षक हुशार विद्यार्थ्याला किंवा जो उत्तर देऊ शकतो त्यालाच प्रश्न विचारतात. जो अभ्यासू आहे, ज्याचं वर्गात लक्ष आहे, तोच प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकेल, अशी खात्री शिक्षकांना असते. कदाचित माझ्याबाबतीतही तसंच असावं. सर्व समस्या सोडविण्यासाठी किंवा सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी शिवाजीराव आढळराव-पाटील हा एकमेव माणूसच योग्य आहे, असं लोकांना वाटत असावं. म्हणूनच ते माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत असावेत. विचारा हो कितीही प्रश्न… राजकीय हेतूने कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करा. पण मी जनता जनार्दनाची मनःपूर्वक सेवा केली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आतापर्यंत वेळोवेळी दिलेलीही आहेत आणि या पुढेही देईन. अर्थातच, मतदारराजाला.

निवडणूक जवळ आली, की सर्व जण तलवारी परजून तयार असतात. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती… हे असंय, की स्वतः काहीच करायचं नाही आणि जो प्रयत्न करतोय त्याला सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडायचं. बरं गंमत बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळी किंवा जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा कधीच चर्चेत येत नाही. लोकसभा निवडणूक आली, बरोबर की वातावरण तापवायला सुरुवात होते. मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होतात. विशिष्ट मंडळी खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं म्हणून हाकाटी पिटू लागतात. खरंतर बैलगाडा शर्यतीसाठी मी केलेल्या प्रयत्नांवर एक पुस्तक तयार होईल. इतके प्रयत्न मी केलेत. अनेकदा भाषणांमधून बोललो आहे. मुलाखतींमध्ये उत्तरं दिली आहेत. ब्लॉगही लिहिले आहेत. पण एकतो आणि वाचतो कोण? फक्त प्रश्न विचारण्यातच लोकांना रस.

बैलगाडा शर्यतींसंदर्भात लोकसभेत केलेले भाषण ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणिबैलगाडा शर्यती हा विषय कायमच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहीलाय. नाही तर या मंडळींनी तो कधीच निकालात काढला असता. लवकरच पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण खंडपिठासमोर (फुल बेंच) ही सुनावणी होणार असून, यामध्ये तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे येणार आहेत. बैलगाडा शर्यती किंवा प्राण्यांचे साहसी क्रीडा प्रकार हा कोर्टासाठी जिव्हाळ्याचा किंवा अग्रक्रमाचा विषय नाही. त्यामुळे जेव्हा सवड असेल, तेव्हाच त्यावर सुनावणी होईल, असं कोर्टानं म्हटलंय. अर्थात, जेव्हा केव्हा सुनावणी होईल तेव्हा निकाल बैलगाडा शर्यतींच्याच बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे.

001 Bailgada_PM Letter002 Bailgada_PM Letter

003_reply PM

बैलांसाठी सर्वप्रथम काढली विमा संघटना

बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा विमा संघटना मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा आ बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खुप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायलाही आजही अभिमान वाटतोय.

शर्यतीच्या घाटांसाठी खासदार निधी

पहिल्यांदा २००४ मध्ये मी खासदार झाल्यावर बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव, भोसरी मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदारसंघ, मतदार आणि बैलगाड्यांचे मालक, बैलगाडा शर्यतींचे चाहते विसरलेले नाहीत.

बैलगाडा शर्यती बंद पाडण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो आणि शर्यती पुन्हा २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत निर्विघ्नपणे सुरू  होत्या. मात्र सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या.

Dada arrest

आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे माझ्यावरच दाखल

बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात  म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणि आहे देखील. या पुढेही मीच यामध्ये अग्रभागी राहणार हे लिहून ठेवा. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटित झाले. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला. बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन छेडल्यामुळेच मी खासदार झालो, असा अनेकांचा गैरसमज. म्हणून ते देखील शर्यतींचे निमित्त करून झळकू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी हे असतो हे अनेकांच्या गावीही नाही. मग काय लढणार ही मंडळी… फक्त सोशल मीडियावर झळकण्यासाठी आंदलनांचा फार्स करणार.

Bailgada dabhade dada copy

बैलगाड्यांसाठी मतभेदांना तिलांजली

मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते यांच्यासह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी हाक दिली आणि एकाच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीं सुरू करण्याबाबतच्या लढाईचे रणशिंग फुंकले. पण लोक राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त बैलगाडा शर्यतींसाठी एकत्र येऊ शकले नाहीत. दिलीप मोहिते वगळता कोणत्याही नेत्याने या व्यासपीठावर येण्याचे धाडस दाखविले नाही. राज्यव्यापी आंदोलनात दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतर कोणताही मोठा नेता फिरकलाही नाही. आज मला प्रश्न विचारणारे लोक तेव्हा कुठे होते हा संशोधनाचाच विषय आहे.

Bail Gada SharyatBail Gada Sharyat 01

IMG-20150805-WA0014 (1)

बैलगाड्यांचा मुद्दा पहिल्यांदा लोकसभेत मांडला

लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या, असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलिकट्टूसाठी कमल हसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून त्या चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडाशर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी चमकायचे हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.

म्हणून माझे एकच सांगणे आहे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचे नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिले आहे. मात्र पहिल्या टर्मपासून बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात कुणी तरी तात्पूरते येवून गेले आणि जात आहेत. मात्र बैलगाडा शर्यती सुरू होणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी आवर्जून सांगतो. सुप्रीम कोर्टातील फुलबेंच समोर बैलगाडा शर्यतींसंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निकाल आपल्याच बाजूने लागणार आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होणार हा मला विश्वास आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर बाजू सक्षम ठेवण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

जय महाराष्ट्र!!!

बैलगाडा शर्यतींसंदर्भातील जुने ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

bullock-cart-759
जून सुरू झालाय आणि जुलै येवू घातलाय आणि याच काळात सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची निर्णायक सुनावणीही होतेय. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषय आलाय आणि मी बोलण्याआधी राजकारणातील कुणी बोललेय असे कधीच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातही झालेले नाही. पर्यायाने एकीकडे जून-जुलैमधल्या पावसाळ्यातील ’कुत्र्यांच्या-छत्र्या’ उगवायला सुरुवात होईल आणि त्याच पध्दतीने याच काळात मी बोललोय म्हटल्यावर अनेक नाटकी बैलगाडाप्रेमी नेते-कार्यकर्ते मंडळीही बोलू लागतील हे माझ्यासाठी नेहमीचे चित्र.
खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणि बैलगाडा-शर्यती हा विषय नेहमीच माझ्यासाठी जणू श्वासच झालाय. अनेकांना असंच वाटतं आलंय की, मी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा लावून धरलाय म्हणूनच खासदार झालोय आणि मग तेही असंच काहीसं करु लागतात. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कित्येक वर्षे कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहिलाय. अन्यथा राजकरणातील काही तथाकथित नेते मंडळींनी बैलगाडा शर्यतींचा विषय कधीच ‘निकालात’ काढला असता. येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायलायात पाच न्यायमुर्तींच्या पूर्ण खंडपीठासमोर (फुल बेंच) निर्णायक सुनावणी होतेय. यात तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहेत. अर्थात याच अनुषंगाने बैलगाडा शर्यती आणि त्या चालू-बंद होण्याच्या इतिहासात डोकवावं आणि आजच्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा म्हणून हे वास्तव मांडतोय.
Bailgada dabhade dada copy
महाराष्ट्रात बैलगाडा विमा संघटना काढणारा पहिला खासदार मीच
बैलगाडा शर्यती हे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात माझ्या शिरुर लोकसभा मतदार संघाचं एक सोहळ्याचं रुप. याच सोहळ्याला आपल्यातीलच काही नतद्र्ष्टांची नजर लागली ती सन २००४-०५ च्या दरम्यान. खरं तर सन २००३-०४ चा काळ आठवा. त्याकाळी बैलगाडा शर्यतींबाबत कोण गंभीर होतं तर कुणीच नाही. माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांना बैलगाडा शर्यतींमध्ये रस होता. त्यांच्यानंतर या विषयात स्वारस्य दाखवून माझा ’अजेंडा’ समजून मी काम केले. बैलगाडा शर्यतींबरोबरच बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या प्रत्येक प्रश्नावरही मी काम केले आणि या प्रश्नी सातत्यही  ठेवले. खरं तर बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘बैलगाडा विमा संघटना’ मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा उपचाराबरोबरच बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खूप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायला मला आजही अभिमान वाटतोय. अर्थात अशा काही अफलातून कल्पनांमुळे बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता अगदी जगात प्रसिध्द झालेल्या ‘पुणे-फेस्टीवल’ पर्यंत पोहचली आणि त्याचे निमित्त आपली एक पिढी आहे याचा मला अभिमान वाटतो.
DSC_0158
IMG_20171220_164228
बैलगाडा शर्यतींच्या घाटाला खासदार निधी देणारा देशातील पहिला खासदारही मीच
सन २००४ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर ’बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी’ देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर-हवेली मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदार संघ विसरलेला नाही. अशाच पध्दतीने बैलगाडा शर्यती ज्या पुणे जिल्ह्यात कधीकाळी एकदम भन्नाट-सुसाट अशा सुरू होत्या त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो अन शर्यती पुन्हा सन २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे सुरू होत्या. मात्र सन २०११ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि आपल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
अर्थात त्याच वेळी मी लगेच सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करुन धाव घेतली आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण राज्यभरात फेब्रुवारी-२०१२ मध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा जोमात सुरू झाल्या. मात्र आडकाठी आणणार नाही ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार कसले हो..? मग पुन्हा एकदा तत्कालीन सरकारकडून आडकाठी आली आणि शर्यती बंद झाल्या. खरं तर बैल हा वरील रानटी प्राण्यांच्या गटात न मोडणारा आणि तुमच्या आमच्या घरातील एक कुटुंबसदस्य असणारा प्राणी. तर इतर प्राणी हे जंगली आहेत हे मी संसदेसह न्यायालयात सिध्द करण्यासाठी कायमच भांडत राहिलो. अर्थात केवळ बैलाला त्या जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळले तरी आपल्या बैलगाडा शर्यती सुरू होणे शक्य आहे. मात्र संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राजकीय व्यवस्था अशा सर्व स्तरावर आर्थिक ताकदीसह लढलो पण तोकडे यश आले आणि ७ मे २०१४ रोजी पुन्हा एकदा याच नियमाद्वारे बैलगाडा शर्यतींवर बंदी लादण्यात आली, तीच आजही कायम आहे.
Dada arrest
बैलगाडा शर्यतींवर सन २००५ पासून आंदोलने करुन गुन्हे दाखल होणारा एकमेव नेता मीच
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणी आहेही. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटीत झालेत. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला आणि रस्त्यावरची आंदोलनेही केली. या आंदोलनांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल झालेला मी एकमेव नेता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बैलगाडा शर्यती हा जसा माझा ‘श्वास’ झाला तोच ‘श्वास’ अनेकांनाही आकर्षित करु लागला आणि बैलगाडा शर्यतीच्या विषयामुळेच आपण खासदार होवू शकतो असे उगाचच कुणालाही वाटू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी असतो हे अनेकांच्या गावीही नाही. अशाच काही उत्साही मंडळींमुळे कायद्याचीच भाषा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मुंबईत नरिमन पॉईंटवर केलेल्या एका बैलगाडा-स्टंटला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग महाराष्ट्राने अनुभवलाय आणि तो क्षण शेतकरी, बैलगाडा शर्यतींशौकीनांसाठी तितकाच वाईटही ठरला.
IMG_1661IMG_1894
बैलगाड्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणाराही मीच
मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, महेश लांडगेंसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी फक्त बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या एकाच अजेंड्यासाठी हाक दिली आणि याच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या एकत्रित लढाईचे रणशिंगही फुंकले. अर्थात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या नावाखाली काही मंडळी उगाच संघटीत होण्याचे चित्र तयार करतात याचे दु:ख खुप वेदना देते हेही आवर्जून सांगावेसे वाटते. अर्थात कुणातरी नेत्याला खुष करण्यासाठी, त्याच्या इशा-यावर चालणारी काही मंडळी ही पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांसारखेच असतात हे मी गेल्या काही वर्षांच्या अनुभवात जवळून पाहिलेले आहे. अर्थात बैलगाडा मालकांकडील वर्गणी, वकील-शिष्ठमंडळांच्या नावाखाली विमानांच्या दिल्ली फे-या, दिल्लीत कुणी तरी नेता पकडून त्याचेबरोबर केलेले फोटो सेशन असा सगळाच खेळ शेतक-यांच्या भावनांशी खेळला गेला आणि जातोय हे या मंडळींच्या गावीही नसते आणि नाही हे विशेष.
vlcsnap-2015-12-25-17h13m01s255
बैलगाड्यावर पहिल्यांदा लोकसभेत बोलणारा पहिला खासदारही मीच!
लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र् मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवजन्मभूमी ‘शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे,’ हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी कमलहसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून तिथे बैलगाडा शर्यती चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी या ‘संधीसाधू-उपटसुंभांनी’ चमकायचे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतक-यांचे खरोखरीच दुर्दैव म्हणावे लागेल.
002 Bailgada_PM Letter001 Bailgada_PM Letter
003_reply PM
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत आणू आणि कायदा करु. मात्र हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जावून त्यावर सही होताच त्यावर अजय मराठे नामक व्यक्तिने आक्षेप घेतले आणि कायदा झाला पण ’नियमावली कुठेय?’ असे म्हणत पुन्हा बैलगाडा शर्यतींपुढे अडचण आली. यावर उच्च न्यायालयाने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवल्याबरोबरच न्यायालयाने पाच सदस्यांचे पूर्ण बेंच यासाठी नेमले आणि त्याचीच सुनावणी येत्या महिनाभरात होईल. अर्थात यासाठी राज्याच्या वतीने लढण्यासाठी राज्याच्या कायदा व विधी विभागाशी मी नुकताच बोललो असून दिल्लीत राज्याच्या वतीने बाजु मांडणारे जे वकील आहेत त्यांचेकडे बैलगाडा शर्यती सुरू होतील अशा पध्दतीचे सर्व पूरावे व बाजु मांडण्यासाठीचे दस्ताऐवज पोहच झाल्याची खात्रीही आपण करुन घेतलेली आहे.
पहा कशी थट्टा, बरी नव्हे ही थट्टा..!
भाजपा सरकारने प्राणी कल्याण मंडळाच्या (अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड) अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन-राव यांची नियुक्ती केलीय. अर्थात केंद्रातील एक मंत्री मनेका गांधी यांच्या सांगण्यावरुन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूनम महाजन या सगळ्यांनी मिळून प्राणी कल्याण मंडळात ज्या जयसिन्हा यांची नियुक्ती केलीय ते जयसिन्हा म्हणजे ‘पेटा’चे (म्हणजेच बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी ज्या पेटा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्यांचेच सदस्य असलेले हे गृहस्थ) सक्रीय सदस्य आहेत हे आपण सगळ्यांनी याचसाठी ध्यानी घ्यायला हवे. कारण या नियुक्तीने भाजपाच्या केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या सर्वच नेते-पदाधिका-यांची भूमिका किती (अ) प्रामाणिक आहे तेच लक्षात येतेय. मात्र बैलगाडा शर्यती-प्रेमी शेतक-यांची जयसिन्हांच्या नियुक्तीच्या निमित्ताने कशी थट्टा केली गेलीय ते आपण प्रत्येकासाठी लक्षवेधी आहे हे नक्की.
म्हणून शेवटी एकच सांगणे ते हे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचेही नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिलेय. मात्र माझ्या खासदारकीच्या अगदी पहिल्या टर्मपासून जी बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात माझ्या सोबतीला आज पर्यंत कुणी सलगपणे टिकले असा एकही ‘हरीचा-लाल’ नाहीये. तरीही बैलगाडा शर्यती सुरू होणे आणि त्या चालू राहणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी, सामान्य शेतक-यांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो!
जय महाराष्ट्र!!!

डोंगर… आपत्तीचा, दुःखांचा आणि आव्हानांचाही

माळीण… नुसता शब्द जरी नुसता कानावर पडला तरी काळजाचा थरकाप उडविणारी महाभयानक घटना डोळ्यासमोर उभी राहते. कधी काळी माळीण नावाचं छोटंसं टुमदार गाव इथं वसलेलं होतं, यावर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वासही बसणार नाही, इतकी भीषण हानी या गावाची झाली आहे. कधीही भरून न येणारं नुकसान आहे. घटनेचं वर्णन करण्यासाठी भीषण आणि भयाण हे शब्द अपुरे पडतील, इतकी अवघड परिस्थिती आहे. अलिकडच्या काळात निसर्गाच्या रुद्रावताराचा मानवी जीवनाला बसलेला सर्वाधिक मोठा फटका म्हणजे माळीण असं मला वाटतं.  Satalite-image   10362619_10204072602993252_2135784327786748095_n

संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं नवी दिल्लीत होतो. माळीणच्या दुर्घटनेची माहिती कळताच राजधानीतच महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांना दुर्घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून दिली. माननीय पंतप्रधानांनी राजनाथसिंह यांना तातडीनं माळीणच्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या सूचना दिल्या.

10169176_10204643856439266_4879685879513590795_n

नवी दिल्लीत हे सगळं सुरू असताना माझं सगळं लक्ष माळीणकडे लागलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात अनेकदा या गावात या ना त्या निमित्तानं जाणं झालं. माझा आणि माळीणचा अगदी ऋणानुबंध निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती काय असेल आणि नेमकं काय झालं असेल, हे जाणून घेत होतो. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक तसंच कार्यकर्त्यांना तातडीनं दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याला हातभार लावण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक शिवसैनिक आदेशाची वाट न पाहता आधीच दुर्घटनास्थळी रवाना झाले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सर्वप्रथम माळीण गावात दाखल झाले होते. तेव्हा ‘एनडीआरएफ’चे जवान किंवा प्रशासनाचे अधिकारीही तिथं पोहोचले नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीनं मदतकार्य सुरू केले होते. शिवसैनिक आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं मला खूप कौतुक आणि अप्रूप वाटतं. कोणतीही आपत्ती कोसळली, की मंडळीच सर्वाधिक आधी तिथं पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात. दुपारनंतर ‘एनडीआरएफ’चे जवान माळीणमध्ये दाखल झाले. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि संघ स्वयंसेवक काम करू लागले.

1602098_868960169800569_1721092214454791634_o

नवी दिल्लीत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांशी सातत्यानं माझी चर्चा सुरू होती. सतत कोसळणारा पाऊस, गावातील ठप्प झालेला वीजपुरवठा यामुळं रात्री दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देणं शक्य नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माळीणमध्ये दाखल झालो. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथसिंह, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि इतर काही नेतेमंडळी सोबत होती. राजनाथसिंह यांनी माळीण गावची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘इथं एक गाव वसलेलं होतं, यावर विश्वासच बसत नाही,’ हे त्यांचं वक्तव्यामध्येच सगंळ काही सांगून गेलं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं राजनाथसिंह यांचं हृदयही हेलावलं. केंद्राच्या वतीनं तातडीनं दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येईल, याची त्यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणं राज्यानं केंद्राकडे गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन गावाच्या पुनर्वसनाची मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदल्या दिवशीच, म्हणजे दुर्घटनेच्या दिवशी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. काळाचा घालाच इतका महाभयानक होता, की आर्थिक मदत, दिलासा, मदतीचे हात या सगळ्यांच्या पलिकडं परिस्थिती पोहोचलेली होती. तरीही केंद्र सरकार आमच्या पाठिशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. ते या निमित्तानं झालं. राजनाथसिंहांच्या नंतर दुपारी मग माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीनंतर मग राज्यानं दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अर्थात, राज्याच्या मदतीमध्ये ७५ टक्के वाटा केंद्राचाच असतो. त्यामुळं केंद्रानं माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी भरभरून दिलंय आणि इथून पुढं देखील लागेल ती सर्व मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, हे मी इथं आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.

10499421_868962049800381_3891409029198393984_o

माळीणच्या दुर्घटनेमुळं कोसळलेला दुःखाचा आणि आव्हानांचा डोंगरच इतका मोठा होता, की त्याची कारणं काय, कशामुळं हे सगळं झालं, दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. कदाचित अजूनही आपण चर्चा करण्याची ही वेळ नाही. भूवैज्ञानिक, पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि संबंधित अभ्यासू मंडळी यावर सखोल संशोधन करून योग्य तो निष्कर्ष काढतील. आपण त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेच्या निमित्ताने माझ्यावर निशाणा साधून टीका केलीच. मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे तसंच वळसे-पाटलांचं झालेलं दिसतंय. त्यांना प्रत्येक ठिकाणी शिवाजीदादाच दिसतो वाटतं.

विनाकारण त्यांनी माझ्यावर टीका केली. मला वादात पडायचं नाही. आणि दुर्घटनेच्या संकटामध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांचा अवमान करायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, की पडकईची कामं करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही पडकईची कामं मनुष्यबळाच्या माध्यमातून झाली असती, तर ते अधिक योग्य झालं असतं.

Malin

आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून उपस्थित करावासा वाटतोय. खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगात दावे नि प्रतिदावे करत बसण्याची माझी इच्छा नाही. मात्र, समोरच्याला हे समजत नसेल तर मी तरी काय करणार. त्यामुळंच फक्त अजून एक उल्लेख करतो. माळीणच्या मदतीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा डिंभे चेकनाका पास केल्यानंतर अडिवरे गावाजवळ पोलिसांनी माझ्या गाडीसह माझ्यासोबतच्या तीन गाड्या अडवल्या. नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल अरुण गिेरे हे माझ्यासोबत गाडीमध्येच होते. पोलिसांनी अरुण गिरे यांना गाडीतून उतरविले. मी माळीणला जाऊन परत येईपर्यंत अरुण गिरे यांना पोलिस बंदोबस्तात तिथेच म्हणजेच अडिवरे गावातच थांबवून ठेवण्यात आले. अरुण गिरे शिवसेनेत आल्याचा धसका दिलीप वळसे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अरुण गिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी अवघड परिस्थिती झालेली दिसतेय. त्यामुळंच ते प्रत्येक ठिकाणी सूडबुद्धी वापरत आहेत.

मला या पोलिसांचं मोठं आश्चर्य वाटतं. तुम्ही पोलिस आहात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिपाई आहात? पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही चालता की दिलीप वळसे-पाटील यांच्या तालावर तुमचा कारभार चालतो? अरे, आंबेगावसह शिरूर मतदारसंघात कायद्याचे राज्य आहे की कुणा एकाची हुकुमशाही आहे? वेळीच सुधारा. राज्यातही पुढचं सरकार आमचं आहे आमचं.

बरं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंबेगावात वेगळा न्याय लावण्याची पद्धत दिसतेय. एकीकडे शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चाळीस-चाळीस गाड्या कोणतीही तपासणी न करता आणि न अडविता सोडल्या जात आहेत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची, खासदाराची गाडी अडविण्याची हिंमत पोलिसांमध्ये येतेच कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना वेगळा न्याय हा कोणता कायदा आहे, याचे उत्तर संबंधितांनी देण्याची आवश्यकता आहे.

‘पडकई’च्या चौकशीला वळसे-पाटील दचकतात का?

  • महाकाय यंत्रसामुग्री वापरून पडकईची कामं केल्यामुळंच ही दुर्घटना झाली का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
  • अशी काय महाकाय आणि जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री वापरली, की पडकईच्या कामांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला, याचा तपास व्हायला पाहिजे.
  • पडकईचे नाव निघताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील एकदम दचकतात का? आणि बॅकफूटवर का जातात? त्यांचे पडकईच्या कामात काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, यावर प्रकाश पडला पाहिजे.
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर हे माझी गाडी अडवून ‘पडकईबाबत बोलू नका. लोक नाराज होतील,’ असं मला सांगतात. काय बोलायचं आणि काय नाही, हे मला सांगणारे विजय मगर कोण. मुळात एका लोकप्रतिनिधीची गाडी अडविण्याचे अधिकार यांना कोणी दिले? काय बोलायचं आणि काय नाही, हे सांगणं पुढची गोष्ट झाली. कोणाच्या तालावर हे नाचताहेत? हा सगळा काय झोल आहे?
  • फक्त पोलिसांमार्फत नाही, तर सीआयडीच्या मार्फत पडकईच्या सर्व कामांची आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी ठाम मागणी आहे.

10556509_10204072604913300_2966336670619223850_n

पुनर्वसनाचे काम वेगाने व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. खचलेल्या मनांना आणि फक्त शरीरानं जिवंत असलेल्या गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचा निवास, भोजन, कपडे तसंच इतर सर्व गोष्टींची व्यवस्था ‘डायनालॉग इंडिया लिमिटेड’ कंपनी आणि ‘भैरवनाथ पतसंस्थे’मार्फत करण्यात येत आहे. गावातील पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदतनिधी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरूच आहे. कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या रुपानेही मदत मोठ्या प्रमाणावर येते आहे.

दुर्घटनेमुळं झालेलं नुकसान आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर यातून आपल्याला पुन्हा उभं रहायचं आहे. गावकऱ्यांना उभं करायचं आहे. त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे. आपण सर्वांनी शिवसेनेच्या मदतकेंद्राला भरघोस मदत करून माळीण गावाच्या विकासासाठी आणि आपत्तीग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लिहिण्यासारखं बरंच आहे. पण आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच…

अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…

वाघ एकला राजा…

DSC_0002

मतदार बंधू-भगिनींनो नमस्कार…

भारतीय लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेला मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. त्या दिवशी योग्य माणूस निवडायला चुकलात, तर मग पुढील पाच वर्षे मनस्ताप करत बसण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळेच सारासार विचार करून योग्य उमेदवारालाच मतदान करा आणि कोणत्याही प्रलोभनांना आणि धमक्यांना नि दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करा.

निवडणुकीच्या वेळी लोक तुमच्या गावात येतील, घरात येतील. हात जोडून मतांचा जोगवा मागतील. निवडणूक जवळ आली, की उगवणारे कोण आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून घरातल्या माणसाप्रमाणे सदैव तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस कोण?याचा विचार करा आणि मगच बटण दाबा.

तुम्ही बघताच आहात. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना एकटाच झुंज देतोय. सगळ्यांना एकटा पुरून उरतोय. मतदारसंघात सहापैकी पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे. केंद्र आणि राज्याप्रमाणाचे जिल्हा परिषदेतही सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची. प्रशासन आणि पोलिस देखील सत्ताधाऱ्यांनाच सामील असलेले. वेळोवेळी माझी आणि माझ्या पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा आणि कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो. विकासकामांचा निधी अडवून ठेव, कधी खोटी माहिती देऊन योजनेची अंमलबजावणीच रद्द कर, मी एखाद्या योजनेसाठी मागितलेला निधी दुसरीकडेच वळव, कधी मी केलेल्या कामांचे उद्घाटन स्वतःच करून खोटा प्रचार कर… असे अनेक मार्ग अवलंबून ही मंडळी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात.

राष्ट्रवादीने तर मला पराभूत करण्यासाठी नेत्यांची आख्खी फौजच्या फौजच शिरूरमध्ये उतरविली आहे. शरद पवार ठाण मांडून आहेत. अजित पवारांनी तर मला पराभूत करण्याचा विडाच उचलला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यासंत्र्यांपासून ते गल्लीबोळातील पदाधिकाऱ्यापर्यंत जो उठतोय तो माझ्या विरोधात बोलतोय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी फर्ड्या इंग्रजीतून बोलणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला ‘तुमचं शिक्षण किती,’ असा प्रश्न विचारला जातोय. घर, संसार आणि उद्योगधंद्याकडं दुर्लक्ष करून माझ्या मतदारसंघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि मला विचारत आहेत, तुम्ही दहा वर्षात काय काम केलं. इतके सगळे आरोप करूनही मी जुमानत नाही, म्हटल्यावर मग आमच्याच काही लोकांना फितवून, फूस लावून आणि पैसे देऊन माझ्याविरोधात लढण्यासाठी उतरविण्यापर्यंत यांची मजल गेली.

10010661_805244569505463_4827094739406973192_o

महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे मला घेरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखलीय. पण मला हे चक्रव्यूह कसं भेदायचं हे मला माहितीय. नुसतं माहितीच नाही, तर मी राष्ट्रवादीचे हे चक्रव्यूह भेदणार आणि पुन्हा विजयी होणार, असा मला विश्वास आहे. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांविरोधात लढा देऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पाच आमदारांविरोधात लढून त्यांना कायमचा धडा मी शिकविणार आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, दहा वर्षांत रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. विकासकामांचा पैसा लाटला नाही. लोकांच्या कामांमध्ये कमिशन खाल्लं नाही. माझा दारूचा धंदा नाही. जुगाराचा आणि मटक्याच्या धंद्यात मी भागीदार नाही. वाळू उपश्याचा धंदा करून पैसे लाटलेले नाही. कधी कोणाला नाडला नाही, की कोणाकडून पैसा उकळला नाही. वाटमाऱ्या करून कधी आपापसांत वाटून घेतले नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीवाले मला घाबरत आहेत. कारण त्यांना माझ्याकडून काहीच वाटा मिळत नाही. भविष्यात आणखी डोईजड होईल म्हणूनच त्यांना स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक प्रतिमेचा शिवाजी नको आहे.

पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कितीही अपशकुन केला, तरी मी निवडून येणारच याची मला खात्री आहे. कारण मी गेली पंधरा-वीस वर्षे लोकांमध्येच वावरलो. माझ्याकडे येईल त्याचे काम प्रामाणिकपणे आणि लवकरात लवकर कसे उरकता येईल, याचा प्रयत्न केला. विकासकामांना प्राधान्य दिले. जात, पात, धर्म आणि पक्ष यापैकी काहीच पाहिले नाही. गावागावांत, खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांमध्ये गेलो. त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुखाचे दिवस दाखविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मतदार बंधू-भगिनी आणि तरुण-तरुणी माझ्या पाठिशी आहेत.

त्यामुळेच मला राष्ट्रवादीच्या या चक्रव्यूहाची भीती नाही. मी बिनधास्त आहे. अरे, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेचा मी खासदार आहे. सच्चा शिवसैनिक आहे. टोळकं करून येणाऱ्या कोल्हे, लांडगे आणि तरसांना मी घाबरत नाही. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ आहे वाघ. आडवे याल तर खबरदार..

1897674_10151935527787030_807607086160904921_n

आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट, दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचे सहकार्य आणि शुभेच्छा, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांचे शुभाशिर्वाद नि तरूण मतदार बंधू-भगिनींच्या शुभेच्छा यांच्या जोरावर माझी वाटचाल सुरू आहे. यंदाही ती सुरूच राहणार. आता तर केंद्रात आणि पुढे राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करून विकासाच्या आणखी योजना राबविण्यासाठी मी सज्ज आहे.

तुमच्या पाठिंब्यामुळेच माझी आजवरची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या सतरा एप्रिलला तुम्ही धनुष्यबाणाच्या समोरील बटण दाबून मला एक नंबरच्या मताधिक्याने विजयी कराल, अशी खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही असेच माझ्यासोबत रहा. कारण तुम्ही सोबत असाल तर राष्ट्रवादी नि काँग्रेसने माझी कितीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला, चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न केला, तरी मी त्यातून मी विजयश्री खेचून वीरासारखा बाहेर पडेन, असा मला आत्मविश्वास आहे.

नवी दिल्लीवर भगवा फडकविण्याचे दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करूया… दिल्ली जिंकूया… गुरूवार दिनांक १७ एप्रिल रोजी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून आपण नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मला प्रचंड बहुमताने विजयी कराल, असा मला विश्वसा आहे…

धन्यवाद.

भगव्या झेंड्याची शान… धनुष्यबाण

जय हिंद… जय महाराष्ट्र…