निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी बैलगाड्यावर

दहा-दहा वर्षे गायब असलेले नेते झळकले फ्लेक्सवर

IMG_1894

लोकसभा निवडणूक जवळ आली, की सगळेच जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आसुसलेले असतात. कोणी दहा-बारा वर्ष गायब असतात आणि एकदम फ्लेक्सवर अवतरतात. तर कुणी अगदी निवडणुकीच्या तोंडावर शत्रूला जाऊन मिळतो आणि राजकीय रंगमंचावर अवतरतो. चार साडेचार वर्षे हे सर्व झोपलेले असतात आणि निवडणुकीच्या मोसमात समोर येतात. बेडकं परवडली किमान दरवर्षी पावसाळ्यात तरी दर्शन देतात. पण हे राकारणी फक्त निवडणूक ते निवडणूकच दिसतात. अशी ही निवडणुकीची गंमत आहे.

अनेकांना खासदार व्हायचे डोहाळे लागले आहेत. दहा-पंधरा वर्ष गायब असलेली मंडळी मला प्रश्न विचारत आहेत, की मी गेली पंधरा वर्ष काय केलं. मी काय केलं हे जनलेताल ठाऊकच आहे. पण तुमचं काय? तुम्ही लोकांसाठी काय केलं ते तरी कळू द्या लोकांना. लेकांनो, तुम्ही जर गेली पंधरा वर्षे राजकारणात सक्रिय असता, तर हा प्रश्न विचारायची वेळच आली नसती. फक्त डोळे उघडे ठेवले असते तरी तुम्हाला समजलं असतं.

जो उठतो तो मला प्रश्न विचारतोय. याचं काय केलं, त्याचं काय झालं. रेल्वे कधी सुरू होणार. बैलगाडा शर्यती कधी चालू होणार वगैरे वगैरे. सगळे प्रश्न मलाच. अर्थात, एक बरंय. शेवटी वर्गातही शिक्षक हुशार विद्यार्थ्याला किंवा जो उत्तर देऊ शकतो त्यालाच प्रश्न विचारतात. जो अभ्यासू आहे, ज्याचं वर्गात लक्ष आहे, तोच प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकेल, अशी खात्री शिक्षकांना असते. कदाचित माझ्याबाबतीतही तसंच असावं. सर्व समस्या सोडविण्यासाठी किंवा सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी शिवाजीराव आढळराव-पाटील हा एकमेव माणूसच योग्य आहे, असं लोकांना वाटत असावं. म्हणूनच ते माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत असावेत. विचारा हो कितीही प्रश्न… राजकीय हेतूने कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करा. पण मी जनता जनार्दनाची मनःपूर्वक सेवा केली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आतापर्यंत वेळोवेळी दिलेलीही आहेत आणि या पुढेही देईन. अर्थातच, मतदारराजाला.

निवडणूक जवळ आली, की सर्व जण तलवारी परजून तयार असतात. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती… हे असंय, की स्वतः काहीच करायचं नाही आणि जो प्रयत्न करतोय त्याला सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडायचं. बरं गंमत बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळी किंवा जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा कधीच चर्चेत येत नाही. लोकसभा निवडणूक आली, बरोबर की वातावरण तापवायला सुरुवात होते. मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होतात. विशिष्ट मंडळी खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं म्हणून हाकाटी पिटू लागतात. खरंतर बैलगाडा शर्यतीसाठी मी केलेल्या प्रयत्नांवर एक पुस्तक तयार होईल. इतके प्रयत्न मी केलेत. अनेकदा भाषणांमधून बोललो आहे. मुलाखतींमध्ये उत्तरं दिली आहेत. ब्लॉगही लिहिले आहेत. पण एकतो आणि वाचतो कोण? फक्त प्रश्न विचारण्यातच लोकांना रस.

बैलगाडा शर्यतींसंदर्भात लोकसभेत केलेले भाषण ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणिबैलगाडा शर्यती हा विषय कायमच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहीलाय. नाही तर या मंडळींनी तो कधीच निकालात काढला असता. लवकरच पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण खंडपिठासमोर (फुल बेंच) ही सुनावणी होणार असून, यामध्ये तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे येणार आहेत. बैलगाडा शर्यती किंवा प्राण्यांचे साहसी क्रीडा प्रकार हा कोर्टासाठी जिव्हाळ्याचा किंवा अग्रक्रमाचा विषय नाही. त्यामुळे जेव्हा सवड असेल, तेव्हाच त्यावर सुनावणी होईल, असं कोर्टानं म्हटलंय. अर्थात, जेव्हा केव्हा सुनावणी होईल तेव्हा निकाल बैलगाडा शर्यतींच्याच बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे.

001 Bailgada_PM Letter002 Bailgada_PM Letter

003_reply PM

बैलांसाठी सर्वप्रथम काढली विमा संघटना

बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा विमा संघटना मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा आ बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खुप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायलाही आजही अभिमान वाटतोय.

शर्यतीच्या घाटांसाठी खासदार निधी

पहिल्यांदा २००४ मध्ये मी खासदार झाल्यावर बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव, भोसरी मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदारसंघ, मतदार आणि बैलगाड्यांचे मालक, बैलगाडा शर्यतींचे चाहते विसरलेले नाहीत.

बैलगाडा शर्यती बंद पाडण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो आणि शर्यती पुन्हा २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत निर्विघ्नपणे सुरू  होत्या. मात्र सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या.

Dada arrest

आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे माझ्यावरच दाखल

बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात  म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणि आहे देखील. या पुढेही मीच यामध्ये अग्रभागी राहणार हे लिहून ठेवा. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटित झाले. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला. बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन छेडल्यामुळेच मी खासदार झालो, असा अनेकांचा गैरसमज. म्हणून ते देखील शर्यतींचे निमित्त करून झळकू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी हे असतो हे अनेकांच्या गावीही नाही. मग काय लढणार ही मंडळी… फक्त सोशल मीडियावर झळकण्यासाठी आंदलनांचा फार्स करणार.

Bailgada dabhade dada copy

बैलगाड्यांसाठी मतभेदांना तिलांजली

मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते यांच्यासह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी हाक दिली आणि एकाच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीं सुरू करण्याबाबतच्या लढाईचे रणशिंग फुंकले. पण लोक राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त बैलगाडा शर्यतींसाठी एकत्र येऊ शकले नाहीत. दिलीप मोहिते वगळता कोणत्याही नेत्याने या व्यासपीठावर येण्याचे धाडस दाखविले नाही. राज्यव्यापी आंदोलनात दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतर कोणताही मोठा नेता फिरकलाही नाही. आज मला प्रश्न विचारणारे लोक तेव्हा कुठे होते हा संशोधनाचाच विषय आहे.

Bail Gada SharyatBail Gada Sharyat 01

IMG-20150805-WA0014 (1)

बैलगाड्यांचा मुद्दा पहिल्यांदा लोकसभेत मांडला

लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या, असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलिकट्टूसाठी कमल हसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून त्या चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडाशर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी चमकायचे हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.

म्हणून माझे एकच सांगणे आहे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचे नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिले आहे. मात्र पहिल्या टर्मपासून बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात कुणी तरी तात्पूरते येवून गेले आणि जात आहेत. मात्र बैलगाडा शर्यती सुरू होणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी आवर्जून सांगतो. सुप्रीम कोर्टातील फुलबेंच समोर बैलगाडा शर्यतींसंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निकाल आपल्याच बाजूने लागणार आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होणार हा मला विश्वास आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर बाजू सक्षम ठेवण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

जय महाराष्ट्र!!!

बैलगाडा शर्यतींसंदर्भातील जुने ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

bullock-cart-759
जून सुरू झालाय आणि जुलै येवू घातलाय आणि याच काळात सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची निर्णायक सुनावणीही होतेय. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषय आलाय आणि मी बोलण्याआधी राजकारणातील कुणी बोललेय असे कधीच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातही झालेले नाही. पर्यायाने एकीकडे जून-जुलैमधल्या पावसाळ्यातील ’कुत्र्यांच्या-छत्र्या’ उगवायला सुरुवात होईल आणि त्याच पध्दतीने याच काळात मी बोललोय म्हटल्यावर अनेक नाटकी बैलगाडाप्रेमी नेते-कार्यकर्ते मंडळीही बोलू लागतील हे माझ्यासाठी नेहमीचे चित्र.
खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणि बैलगाडा-शर्यती हा विषय नेहमीच माझ्यासाठी जणू श्वासच झालाय. अनेकांना असंच वाटतं आलंय की, मी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा लावून धरलाय म्हणूनच खासदार झालोय आणि मग तेही असंच काहीसं करु लागतात. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कित्येक वर्षे कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहिलाय. अन्यथा राजकरणातील काही तथाकथित नेते मंडळींनी बैलगाडा शर्यतींचा विषय कधीच ‘निकालात’ काढला असता. येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायलायात पाच न्यायमुर्तींच्या पूर्ण खंडपीठासमोर (फुल बेंच) निर्णायक सुनावणी होतेय. यात तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहेत. अर्थात याच अनुषंगाने बैलगाडा शर्यती आणि त्या चालू-बंद होण्याच्या इतिहासात डोकवावं आणि आजच्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा म्हणून हे वास्तव मांडतोय.
Bailgada dabhade dada copy
महाराष्ट्रात बैलगाडा विमा संघटना काढणारा पहिला खासदार मीच
बैलगाडा शर्यती हे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात माझ्या शिरुर लोकसभा मतदार संघाचं एक सोहळ्याचं रुप. याच सोहळ्याला आपल्यातीलच काही नतद्र्ष्टांची नजर लागली ती सन २००४-०५ च्या दरम्यान. खरं तर सन २००३-०४ चा काळ आठवा. त्याकाळी बैलगाडा शर्यतींबाबत कोण गंभीर होतं तर कुणीच नाही. माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांना बैलगाडा शर्यतींमध्ये रस होता. त्यांच्यानंतर या विषयात स्वारस्य दाखवून माझा ’अजेंडा’ समजून मी काम केले. बैलगाडा शर्यतींबरोबरच बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या प्रत्येक प्रश्नावरही मी काम केले आणि या प्रश्नी सातत्यही  ठेवले. खरं तर बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘बैलगाडा विमा संघटना’ मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा उपचाराबरोबरच बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खूप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायला मला आजही अभिमान वाटतोय. अर्थात अशा काही अफलातून कल्पनांमुळे बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता अगदी जगात प्रसिध्द झालेल्या ‘पुणे-फेस्टीवल’ पर्यंत पोहचली आणि त्याचे निमित्त आपली एक पिढी आहे याचा मला अभिमान वाटतो.
DSC_0158
IMG_20171220_164228
बैलगाडा शर्यतींच्या घाटाला खासदार निधी देणारा देशातील पहिला खासदारही मीच
सन २००४ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर ’बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी’ देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर-हवेली मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदार संघ विसरलेला नाही. अशाच पध्दतीने बैलगाडा शर्यती ज्या पुणे जिल्ह्यात कधीकाळी एकदम भन्नाट-सुसाट अशा सुरू होत्या त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो अन शर्यती पुन्हा सन २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे सुरू होत्या. मात्र सन २०११ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि आपल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
अर्थात त्याच वेळी मी लगेच सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करुन धाव घेतली आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण राज्यभरात फेब्रुवारी-२०१२ मध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा जोमात सुरू झाल्या. मात्र आडकाठी आणणार नाही ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार कसले हो..? मग पुन्हा एकदा तत्कालीन सरकारकडून आडकाठी आली आणि शर्यती बंद झाल्या. खरं तर बैल हा वरील रानटी प्राण्यांच्या गटात न मोडणारा आणि तुमच्या आमच्या घरातील एक कुटुंबसदस्य असणारा प्राणी. तर इतर प्राणी हे जंगली आहेत हे मी संसदेसह न्यायालयात सिध्द करण्यासाठी कायमच भांडत राहिलो. अर्थात केवळ बैलाला त्या जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळले तरी आपल्या बैलगाडा शर्यती सुरू होणे शक्य आहे. मात्र संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राजकीय व्यवस्था अशा सर्व स्तरावर आर्थिक ताकदीसह लढलो पण तोकडे यश आले आणि ७ मे २०१४ रोजी पुन्हा एकदा याच नियमाद्वारे बैलगाडा शर्यतींवर बंदी लादण्यात आली, तीच आजही कायम आहे.
Dada arrest
बैलगाडा शर्यतींवर सन २००५ पासून आंदोलने करुन गुन्हे दाखल होणारा एकमेव नेता मीच
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणी आहेही. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटीत झालेत. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला आणि रस्त्यावरची आंदोलनेही केली. या आंदोलनांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल झालेला मी एकमेव नेता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बैलगाडा शर्यती हा जसा माझा ‘श्वास’ झाला तोच ‘श्वास’ अनेकांनाही आकर्षित करु लागला आणि बैलगाडा शर्यतीच्या विषयामुळेच आपण खासदार होवू शकतो असे उगाचच कुणालाही वाटू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी असतो हे अनेकांच्या गावीही नाही. अशाच काही उत्साही मंडळींमुळे कायद्याचीच भाषा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मुंबईत नरिमन पॉईंटवर केलेल्या एका बैलगाडा-स्टंटला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग महाराष्ट्राने अनुभवलाय आणि तो क्षण शेतकरी, बैलगाडा शर्यतींशौकीनांसाठी तितकाच वाईटही ठरला.
IMG_1661IMG_1894
बैलगाड्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणाराही मीच
मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, महेश लांडगेंसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी फक्त बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या एकाच अजेंड्यासाठी हाक दिली आणि याच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या एकत्रित लढाईचे रणशिंगही फुंकले. अर्थात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या नावाखाली काही मंडळी उगाच संघटीत होण्याचे चित्र तयार करतात याचे दु:ख खुप वेदना देते हेही आवर्जून सांगावेसे वाटते. अर्थात कुणातरी नेत्याला खुष करण्यासाठी, त्याच्या इशा-यावर चालणारी काही मंडळी ही पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांसारखेच असतात हे मी गेल्या काही वर्षांच्या अनुभवात जवळून पाहिलेले आहे. अर्थात बैलगाडा मालकांकडील वर्गणी, वकील-शिष्ठमंडळांच्या नावाखाली विमानांच्या दिल्ली फे-या, दिल्लीत कुणी तरी नेता पकडून त्याचेबरोबर केलेले फोटो सेशन असा सगळाच खेळ शेतक-यांच्या भावनांशी खेळला गेला आणि जातोय हे या मंडळींच्या गावीही नसते आणि नाही हे विशेष.
vlcsnap-2015-12-25-17h13m01s255
बैलगाड्यावर पहिल्यांदा लोकसभेत बोलणारा पहिला खासदारही मीच!
लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र् मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवजन्मभूमी ‘शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे,’ हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी कमलहसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून तिथे बैलगाडा शर्यती चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी या ‘संधीसाधू-उपटसुंभांनी’ चमकायचे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतक-यांचे खरोखरीच दुर्दैव म्हणावे लागेल.
002 Bailgada_PM Letter001 Bailgada_PM Letter
003_reply PM
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत आणू आणि कायदा करु. मात्र हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जावून त्यावर सही होताच त्यावर अजय मराठे नामक व्यक्तिने आक्षेप घेतले आणि कायदा झाला पण ’नियमावली कुठेय?’ असे म्हणत पुन्हा बैलगाडा शर्यतींपुढे अडचण आली. यावर उच्च न्यायालयाने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवल्याबरोबरच न्यायालयाने पाच सदस्यांचे पूर्ण बेंच यासाठी नेमले आणि त्याचीच सुनावणी येत्या महिनाभरात होईल. अर्थात यासाठी राज्याच्या वतीने लढण्यासाठी राज्याच्या कायदा व विधी विभागाशी मी नुकताच बोललो असून दिल्लीत राज्याच्या वतीने बाजु मांडणारे जे वकील आहेत त्यांचेकडे बैलगाडा शर्यती सुरू होतील अशा पध्दतीचे सर्व पूरावे व बाजु मांडण्यासाठीचे दस्ताऐवज पोहच झाल्याची खात्रीही आपण करुन घेतलेली आहे.
पहा कशी थट्टा, बरी नव्हे ही थट्टा..!
भाजपा सरकारने प्राणी कल्याण मंडळाच्या (अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड) अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन-राव यांची नियुक्ती केलीय. अर्थात केंद्रातील एक मंत्री मनेका गांधी यांच्या सांगण्यावरुन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूनम महाजन या सगळ्यांनी मिळून प्राणी कल्याण मंडळात ज्या जयसिन्हा यांची नियुक्ती केलीय ते जयसिन्हा म्हणजे ‘पेटा’चे (म्हणजेच बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी ज्या पेटा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्यांचेच सदस्य असलेले हे गृहस्थ) सक्रीय सदस्य आहेत हे आपण सगळ्यांनी याचसाठी ध्यानी घ्यायला हवे. कारण या नियुक्तीने भाजपाच्या केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या सर्वच नेते-पदाधिका-यांची भूमिका किती (अ) प्रामाणिक आहे तेच लक्षात येतेय. मात्र बैलगाडा शर्यती-प्रेमी शेतक-यांची जयसिन्हांच्या नियुक्तीच्या निमित्ताने कशी थट्टा केली गेलीय ते आपण प्रत्येकासाठी लक्षवेधी आहे हे नक्की.
म्हणून शेवटी एकच सांगणे ते हे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचेही नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिलेय. मात्र माझ्या खासदारकीच्या अगदी पहिल्या टर्मपासून जी बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात माझ्या सोबतीला आज पर्यंत कुणी सलगपणे टिकले असा एकही ‘हरीचा-लाल’ नाहीये. तरीही बैलगाडा शर्यती सुरू होणे आणि त्या चालू राहणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी, सामान्य शेतक-यांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो!
जय महाराष्ट्र!!!

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘आपण मारणाऱ्याचा हात पकडू शकतो. पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत.’ आता एकदम मला या म्हणीची आठवण झाली. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय बोलायचं तेच मला कळत नाही. अशाच प्रवृत्तीचे एक महाशय म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करण्यासाठीच मी हा ब्लॉग लिहितोय.

बरीच धापवळ आणि शोधाशोध केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सापडला आणि त्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री महाशयांनी केली. तेव्हा त्यांना अचानक बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालक वगैरे गोष्टींची आठवण झाली. बैलगाडा शर्यती भविष्यात थांबवायच्या नसतील, तर बैलगाडा मालक असलेल्या  उमेदवारालाच निवडून द्या, अशी सूचनावजा दमच त्यांनी शेतकऱ्यांना भरला. अहो, अजित पवार जनाची नाही, पण मनाची तरी थोडी बाळगा… 

0021

नेमका निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतींचा विषय आठवतो का? मतांवर डोळा ठेवून किती घाणेरडं राजकारण कराल. बैलगाडा शर्यतींविरोधात २००५ पासून रण पेटले होते. कोर्टकचेऱ्या चालू होत्या, बंदी उठवण्यासाठी मागणी होत होती आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे गायब झाला होतात. अहो, इतकंच काय, दोनवेळा तुमच्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातलीच, शिवाय प्रत्यक्ष कायदेशीर मार्गांनी लढा देण्याची वेळ आली, तेव्हा सरकारने पळ देखील काढला.

दादा तुम्हाला आठवणार नाहीच. पण मला चांगलं आठवतंय. पहिल्यांदा २००५ मध्ये बंदी आली होती. तेव्हा तुम्ही कुठे दडून बसला होता आम्हाला माहिती नाही. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात मंचरमध्ये आंदोलन झालं. आणि तुमच्या पोलिसांनी बैलगाडा मालकांना गुराढोरा सारख मारलं आणि माझ्यासह ५८ निरपराध शेतकऱ्यांवर कलम ३०७चे खटले दाखल केले. पण मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन समर्थपणे लढा दिला होता आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. तुम्ही, तुमचे कार्यकर्ते, तुमचा पक्ष आणि तुमचे आताचे उमेदवार तेव्हा कुठे गायब झाला होता. तुमचे कार्यकर्ते फक्त कोर्टातील विजयाचा जल्लोष साजरा करताना पुढे पुढे मिरवित होते. अजित पवार हेच का तुमचे बैलगाडा शर्यतींचे प्रेम आणि जिव्हाळा.

1913388_775197562510164_984222003_o

जेव्हा २००५ मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती, तेव्हा मंचरमध्ये दंगल उसळली होती. शेतकऱ्यांनी या अन्यायकारक बंदीविरोधात जाब विचारला होता. तेव्हा माझ्यासह ५८ जणांवर केसेस दाखल केल्या होत्या. जेव्हा कोर्टाने बैलगाडा शर्यतींच्या बाजूने निकाल दिला तेव्हा महाराष्ट्राचे तोंडपाटील गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घोषणा केली, की सर्वच्या सर्व ५८ जणांच्या  विरोधातील खटले मागे घेतले जातील. नऊ वर्षे झाली आज त्या घटनेला. पण अजून एकाही शेतकऱ्याविरुद्धचा खटला मागे घेण्यात आलेला नाही. उलट आता सर्वांना पोलिस खात्याने अटक वॉरंट धाडले आहे. नेमके निवडणुकीच्या तोंडावर ही अटक वॉरंट धाडण्याचे कारण काय? तुम्ही शेतकऱ्यांना गर्भित इशारा देताय का, की राष्ट्रवादीला मतदान केले नाही, तर तुम्हाला तुरुंगात डांबू? मतांसाठी शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा नवा व्यवसाय सुरू केलाय का राष्ट्रवादी काँग्रेसनं. खबरदार जर माझ्या शेतकऱ्याला हात लावाल तर.

अजित पवार तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरातील तुमच्याच पक्षाच्या काही शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी घेतलेली ती भेट आठवतेय का बरं? तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा. पण मला चांगली आठवतेय. त्यावेळी परिसरातील अनेक गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी आणि बैलगाडा मालक तुमच्याकडे आले होते. ‘दादा, काहीतरी करा. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी…’ अशी गळ घालत होते. पण तेव्हा तुम्ही त्यांची बाजू ऐकून घेतली नाहीच. पण त्यांना कोणतीही मदत न करता हाकलवून लावलं. शिवाय त्यांनाच चार खडे बोल सुनाविले. ‘शर्यतींचा नाद कसला करता. बैलगाडा शर्यती काही चांगल्या नाहीत. तुम्हाला हे नसते धंदे करायला कुणी सांगितले. चालते व्हा आणि पुन्हा असल्या मागण्या घेऊन माझ्याकडे यायचं नाही,’ असा दम भरून राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही हुसकावून काढले होते. बघा जरा आठवतोय का तो प्रसंग…

अजित पवार तुमच्यासारखा दुटप्पी आणि दुतोंडी माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शोधून सापडायचा नाही. आधी शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना हाकलवून लावले. त्यांचा अपमान केला. त्यांना चालते व्हा म्हणालात. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पुळका आलाय का तुम्हाला. ज्यांना तुम्ही ‘चालते व्हा’ म्हणालात ती मंडळी आणि ते बैलगाडा मालक, शेतकरी तुम्हाला ‘चालते व्हा’ म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारराजा हा आंधळा, बहिरा आणि मुका नाही. तो हुशार आहे. त्याला माहितीये आपला कोण आणि परका कोण? वेळप्रसंगी मदतीला धावून येणारा कोण आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त गोडगोड बोलणारा कोण हे मतदाराला चांगलं ठावूक आहे. त्यामुळं तुम्ही बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालकांबद्दलचं खोटं प्रेम व्यक्त करून मतांवर डोळा ठेवू नका. तुमच्या पदरी निराशाच येणार आहे.

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ब्लॉग या नव्या माध्यमाच्या विश्वात पहिलं पाऊल टाकताना आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विषयाशिवाय आणखी कोणता विषय समर्पक असू शकतो, असं आपलं मला सहज वाटलं. आम्हाला नव्याच्यी कास धरायची आहे. अगदी जरुर धरायची आहे. मात्र, हे करताना आम्ही आमची संस्कृती आणि प्रथापरंपरांना फाटा देऊ शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळंच माझा पहिला ब्लॉग हा माझ्या लाडक्या सर्जा-राजासाठी…

Image

बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालं बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठून आणि पुन्हा सुरू होऊन. राज्य सरकारनं ऑगस्ट २०११ मध्ये सर्क्युलर काढून बैलगाडा शर्यतींवरील बंदी म्हणजे कोणताही सारासार विचार न करता घेतलेला मोगलाई निर्णय होता. नंतर हायकोर्टातही ही बंदी काय राहिली. मात्र, उत्साही गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचे सुरूच ठेवले. त्यामुळे गावागावांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. सर्वसामान्य शेतकरी त्यामुळं नाडला गेला. शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत, अशा पद्धतीनं भाषणे ठोकायची. मात्र, त्याच शेतकऱ्याला कसा त्रास होईल, यासाठी सर्क्युलर काढायचे. व्वा.. रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

काय झालं या बंदीमुळं. शेतकऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या माथी लागले. मुळात अशी बंदी घालण्याची काही आवश्यकताच नव्हती. कारण कोणत्याही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, तो स्वतःपेक्षा त्याच्याकडील पशुधन अधिक प्रेमाने जपतो. त्यांची स्वतःच्या जिवापेक्षा अधिक काळजी घेतो. वेळप्रसंगी तो स्वतः उपाशी राहिल, पण आपल्या गायी-बैलांना चारा दिल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. पोटच्या पोरासारखा तो जनावरांना जपत असतो. त्यामुळं बैलगाडा शर्यतींमुळं बैल जोड्यांवर अन्याय, अत्याचार होईल, ही धारणाच चुकीची आहे.

पण ‘व्हाइटकॉलर’ म्हणजेच पांढरपेशा मंडळींच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. शेतकऱ्यांच्या आनंदावर, त्याच्या मनोरंजनावरच बंदी आली. मग गावोगावच्या यात्रा ओस पडू लागल्या. यात्रेमुळे पोट भरणारे वाजंत्रीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक आणि जत्रेत सहभागी होणारे विक्रेते यांचा रोजगारच बुडाला. पण आम आदमीच्या सोबत आमचा हात आहे, अशा गप्पा ठोकणाऱ्यांनी त्यांच्याच पोटावर पाय आणला होता.

पांढरपेशा समाजाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही लढा उभारला. नाही, ही बंदी आम्ही खपवून घेणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढू, असे सर्वांनी ठरविले. कधी रास्ता रोको केला. झोपी गेलेल्या राज्य सरकारकडे बैलगाडा मालकांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. बैलगाडा मालक आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.  बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर होते, आबा शेवाळे होते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथले बैलगाडा मालक होते. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली.

आम्ही आमच्या पोरांपेक्षा अधिक प्रेम हे गायीबैलांवर करतो, हे सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पटवून दिलं. शेवटी त्यांनाही आमचे म्हणणे पटले आणि सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेतली. शेतकरी बैलांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे हाल करीत नाही, हे न्यायमूर्तींना पटले. आमच्या लढ्याला निर्भेळ यश आल्यामुळं मला वैयक्तिकपणे खूप आनंद झाला. माझ्या बळीराजासाठी मी काही करु शकलो, अशी भावना खूप सुखावह होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानंच परवानगी दिल्यामुळं पुन्हा एकदा गावागावांमधून भिर्रर्रर्रर्रर्रर्र… चा आवाज घुमू लागला आणि बैलगाडा शर्यती भरू लागल्या.

(वृत्त आणि व्हिडिओ पाहाः http://bharat4india.com/mediaitem/1466-top-news)

माघी पौर्णिमेच्या निमित्तानं गावागावांना भेटी देत फिरत होतो. तेव्हाही बैलगाडा शर्यतींमुळं बळीराजाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बैलगाडा शर्यतींमुळं गावांचं हरवलेलं गावपण पुन्हा एकदा मिळालं. गावात चैतन्य आलं. उत्साह आला. जल्लोष आला. सारे श्रेय बैलगाडा मालकांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचे होते. मी फक्त निमित्त मात्र. त्यांच्यासोबत होतो इतकंच. पण आमच्या यशाचे श्रेय लाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शेतकरी राजा सूज्ञ आहे. त्याला आपले कोण आणि परके कोण हे चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळंच अशा श्रेय लाटणाऱ्यांबद्दल शब्द वाया न घालविलेलेच बरे.

मुळात मला अनेकदा वाटतं, की ही पांढरपेशी मंडळी फक्त बैलगाडा शर्यतींनाच का टार्गेट करतात. म्हणजे बैलगाडा शर्यती या देशभरात भरविल्या जातात. किला रायपूरच्या ग्रामीण ऑलिंपिकमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते. तमिळनाडूत पोंगलच्या सणानिमित्त ‘जालिकट्टू’चे आयोजन होत असते. कर्नाटकातही बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता प्रचंड आहे. इतकेच काय तर आपला शेजारी असलेल्या बांग्लादेशामध्येही बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद मिळतो. इतक्या सर्वदूर जर बैलगाडा शर्यतींना प्रतिसाद मिळत असेल तर या पांढरपेशा मंडळींच्या डोळ्यात का खुपते देव जाणे.

एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी ही मंडळी करतात. पण दुसरीकडे अश्वशर्यतींवर हीच मंडळी पैसै लावतात. घोड्यांच्या शर्यतींमुळे त्यांचे हाल होत नाहीत का. पोलोसारखा किंवा इक्वेस्ट्रियन या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो. त्या खेळांवर बंदी आणावी, म्हणून कोणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग सामान्य शेतकऱ्याला आनंद मिळवून देणाऱ्या बैलगाडा शर्यतीच टार्गेट का.

त्यांना कोणी वाली नाही, अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायमच उभा होतो, आहे आणि राहीन. मग ते बैलगाडा शर्यतींचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारी कोणतीही समस्या असो. शिवाजीराव आढळराव पाटील कायम त्यांच्या सोबत असेल. फक्त पाठिशी थांबणार नाही. तर त्यांच्यासोबत रस्त्यावरही उतरेन.

येळकोट येळकोट… जय मल्हार…