डोंगर… आपत्तीचा, दुःखांचा आणि आव्हानांचाही

माळीण… नुसता शब्द जरी नुसता कानावर पडला तरी काळजाचा थरकाप उडविणारी महाभयानक घटना डोळ्यासमोर उभी राहते. कधी काळी माळीण नावाचं छोटंसं टुमदार गाव इथं वसलेलं होतं, यावर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वासही बसणार नाही, इतकी भीषण हानी या गावाची झाली आहे. कधीही भरून न येणारं नुकसान आहे. घटनेचं वर्णन करण्यासाठी भीषण आणि भयाण हे शब्द अपुरे पडतील, इतकी अवघड परिस्थिती आहे. अलिकडच्या काळात निसर्गाच्या रुद्रावताराचा मानवी जीवनाला बसलेला सर्वाधिक मोठा फटका म्हणजे माळीण असं मला वाटतं.  Satalite-image   10362619_10204072602993252_2135784327786748095_n

संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं नवी दिल्लीत होतो. माळीणच्या दुर्घटनेची माहिती कळताच राजधानीतच महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांना दुर्घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून दिली. माननीय पंतप्रधानांनी राजनाथसिंह यांना तातडीनं माळीणच्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या सूचना दिल्या.

10169176_10204643856439266_4879685879513590795_n

नवी दिल्लीत हे सगळं सुरू असताना माझं सगळं लक्ष माळीणकडे लागलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात अनेकदा या गावात या ना त्या निमित्तानं जाणं झालं. माझा आणि माळीणचा अगदी ऋणानुबंध निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती काय असेल आणि नेमकं काय झालं असेल, हे जाणून घेत होतो. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक तसंच कार्यकर्त्यांना तातडीनं दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याला हातभार लावण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक शिवसैनिक आदेशाची वाट न पाहता आधीच दुर्घटनास्थळी रवाना झाले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सर्वप्रथम माळीण गावात दाखल झाले होते. तेव्हा ‘एनडीआरएफ’चे जवान किंवा प्रशासनाचे अधिकारीही तिथं पोहोचले नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीनं मदतकार्य सुरू केले होते. शिवसैनिक आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं मला खूप कौतुक आणि अप्रूप वाटतं. कोणतीही आपत्ती कोसळली, की मंडळीच सर्वाधिक आधी तिथं पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात. दुपारनंतर ‘एनडीआरएफ’चे जवान माळीणमध्ये दाखल झाले. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि संघ स्वयंसेवक काम करू लागले.

1602098_868960169800569_1721092214454791634_o

नवी दिल्लीत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांशी सातत्यानं माझी चर्चा सुरू होती. सतत कोसळणारा पाऊस, गावातील ठप्प झालेला वीजपुरवठा यामुळं रात्री दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देणं शक्य नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माळीणमध्ये दाखल झालो. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथसिंह, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि इतर काही नेतेमंडळी सोबत होती. राजनाथसिंह यांनी माळीण गावची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘इथं एक गाव वसलेलं होतं, यावर विश्वासच बसत नाही,’ हे त्यांचं वक्तव्यामध्येच सगंळ काही सांगून गेलं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं राजनाथसिंह यांचं हृदयही हेलावलं. केंद्राच्या वतीनं तातडीनं दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येईल, याची त्यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणं राज्यानं केंद्राकडे गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन गावाच्या पुनर्वसनाची मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदल्या दिवशीच, म्हणजे दुर्घटनेच्या दिवशी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. काळाचा घालाच इतका महाभयानक होता, की आर्थिक मदत, दिलासा, मदतीचे हात या सगळ्यांच्या पलिकडं परिस्थिती पोहोचलेली होती. तरीही केंद्र सरकार आमच्या पाठिशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. ते या निमित्तानं झालं. राजनाथसिंहांच्या नंतर दुपारी मग माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीनंतर मग राज्यानं दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अर्थात, राज्याच्या मदतीमध्ये ७५ टक्के वाटा केंद्राचाच असतो. त्यामुळं केंद्रानं माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी भरभरून दिलंय आणि इथून पुढं देखील लागेल ती सर्व मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, हे मी इथं आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.

10499421_868962049800381_3891409029198393984_o

माळीणच्या दुर्घटनेमुळं कोसळलेला दुःखाचा आणि आव्हानांचा डोंगरच इतका मोठा होता, की त्याची कारणं काय, कशामुळं हे सगळं झालं, दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. कदाचित अजूनही आपण चर्चा करण्याची ही वेळ नाही. भूवैज्ञानिक, पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि संबंधित अभ्यासू मंडळी यावर सखोल संशोधन करून योग्य तो निष्कर्ष काढतील. आपण त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेच्या निमित्ताने माझ्यावर निशाणा साधून टीका केलीच. मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे तसंच वळसे-पाटलांचं झालेलं दिसतंय. त्यांना प्रत्येक ठिकाणी शिवाजीदादाच दिसतो वाटतं.

विनाकारण त्यांनी माझ्यावर टीका केली. मला वादात पडायचं नाही. आणि दुर्घटनेच्या संकटामध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांचा अवमान करायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, की पडकईची कामं करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही पडकईची कामं मनुष्यबळाच्या माध्यमातून झाली असती, तर ते अधिक योग्य झालं असतं.

Malin

आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून उपस्थित करावासा वाटतोय. खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगात दावे नि प्रतिदावे करत बसण्याची माझी इच्छा नाही. मात्र, समोरच्याला हे समजत नसेल तर मी तरी काय करणार. त्यामुळंच फक्त अजून एक उल्लेख करतो. माळीणच्या मदतीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा डिंभे चेकनाका पास केल्यानंतर अडिवरे गावाजवळ पोलिसांनी माझ्या गाडीसह माझ्यासोबतच्या तीन गाड्या अडवल्या. नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल अरुण गिेरे हे माझ्यासोबत गाडीमध्येच होते. पोलिसांनी अरुण गिरे यांना गाडीतून उतरविले. मी माळीणला जाऊन परत येईपर्यंत अरुण गिरे यांना पोलिस बंदोबस्तात तिथेच म्हणजेच अडिवरे गावातच थांबवून ठेवण्यात आले. अरुण गिरे शिवसेनेत आल्याचा धसका दिलीप वळसे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अरुण गिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी अवघड परिस्थिती झालेली दिसतेय. त्यामुळंच ते प्रत्येक ठिकाणी सूडबुद्धी वापरत आहेत.

मला या पोलिसांचं मोठं आश्चर्य वाटतं. तुम्ही पोलिस आहात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिपाई आहात? पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही चालता की दिलीप वळसे-पाटील यांच्या तालावर तुमचा कारभार चालतो? अरे, आंबेगावसह शिरूर मतदारसंघात कायद्याचे राज्य आहे की कुणा एकाची हुकुमशाही आहे? वेळीच सुधारा. राज्यातही पुढचं सरकार आमचं आहे आमचं.

बरं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंबेगावात वेगळा न्याय लावण्याची पद्धत दिसतेय. एकीकडे शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चाळीस-चाळीस गाड्या कोणतीही तपासणी न करता आणि न अडविता सोडल्या जात आहेत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची, खासदाराची गाडी अडविण्याची हिंमत पोलिसांमध्ये येतेच कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना वेगळा न्याय हा कोणता कायदा आहे, याचे उत्तर संबंधितांनी देण्याची आवश्यकता आहे.

‘पडकई’च्या चौकशीला वळसे-पाटील दचकतात का?

  • महाकाय यंत्रसामुग्री वापरून पडकईची कामं केल्यामुळंच ही दुर्घटना झाली का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
  • अशी काय महाकाय आणि जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री वापरली, की पडकईच्या कामांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला, याचा तपास व्हायला पाहिजे.
  • पडकईचे नाव निघताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील एकदम दचकतात का? आणि बॅकफूटवर का जातात? त्यांचे पडकईच्या कामात काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, यावर प्रकाश पडला पाहिजे.
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर हे माझी गाडी अडवून ‘पडकईबाबत बोलू नका. लोक नाराज होतील,’ असं मला सांगतात. काय बोलायचं आणि काय नाही, हे मला सांगणारे विजय मगर कोण. मुळात एका लोकप्रतिनिधीची गाडी अडविण्याचे अधिकार यांना कोणी दिले? काय बोलायचं आणि काय नाही, हे सांगणं पुढची गोष्ट झाली. कोणाच्या तालावर हे नाचताहेत? हा सगळा काय झोल आहे?
  • फक्त पोलिसांमार्फत नाही, तर सीआयडीच्या मार्फत पडकईच्या सर्व कामांची आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी ठाम मागणी आहे.

10556509_10204072604913300_2966336670619223850_n

पुनर्वसनाचे काम वेगाने व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. खचलेल्या मनांना आणि फक्त शरीरानं जिवंत असलेल्या गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचा निवास, भोजन, कपडे तसंच इतर सर्व गोष्टींची व्यवस्था ‘डायनालॉग इंडिया लिमिटेड’ कंपनी आणि ‘भैरवनाथ पतसंस्थे’मार्फत करण्यात येत आहे. गावातील पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदतनिधी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरूच आहे. कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या रुपानेही मदत मोठ्या प्रमाणावर येते आहे.

दुर्घटनेमुळं झालेलं नुकसान आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर यातून आपल्याला पुन्हा उभं रहायचं आहे. गावकऱ्यांना उभं करायचं आहे. त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे. आपण सर्वांनी शिवसेनेच्या मदतकेंद्राला भरघोस मदत करून माळीण गावाच्या विकासासाठी आणि आपत्तीग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लिहिण्यासारखं बरंच आहे. पण आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच…

अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…

फुकटचे श्रेय लाटण्याचा साथीचा आजार

थंडीला अलविदा करीत मार्च महिना उगवला. उन्हाच्या झळा हळूहळू बसायला लागल्यात. मधूनच थंडी डोकं वर काढतेय. ढग दाटून येतात आणि कुठंकुठं पाऊसही पडतोय. महाराष्ट्राच्या काही भागात तर गारपीट झालीय. सारख्याच बदलत जाणाऱ्या मोसमामुळं सगळीकडंच सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरलीय. घराघरात एखाद दुसरा पेशंट तरी असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत.

हे झालं नेहमीच्या आजारांचं. हळूहळू तापत चाललेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एका साथीच्या आजाराचा झपाट्यानं फैलाव होतोय आणि तो आजार आहे श्रेय लाटण्याचा. स्वतः काहीच करायचं नाही नि दुसऱ्यानं केलेल्या कामावर हक्क सांगायचा, हे या आजाराचं सहजपणे दिसून येणारं लक्षण. ‘आयत्या बिळात नागोबा’सारखा प्रकार. हा आजार फारच गमतीशीर. महाराष्ट्रात तर निवडणूक आली, की हा आजाराची झपाट्यानं लागण होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना श्रेय लाटण्याच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय.

मध्यंतरी त्यांचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैलगाडा शर्यतींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याच पक्षाचे दोन आमदार मी केलेल्या कामांचं श्रेय उपटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी एक आहेत, जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके आणि दुसरे म्हणजे आंबेगावचे आमदार आणि विधासभा अध्यक्ष असूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं राहण्यास घाबरलेले दिलीप वळसे-पाटील. अजित पवारांच्या आजाराची लागण या मंडळींनाही झालेली दिसतेय. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मी खासदार म्हणून केंद्रीय निधीतून पैसा आणून केलेल्या रस्त्यांच्या कामाची उद्घाटनं ही मंडळी बिनधास्तपणे करण्याचा प्रयत्न करताहेत. नुसत्या उद्घाटनांवरच थांबले नाहीत तर हे रस्ते आमच्याच निधीतून तयार होणार आहेत, असं खोटं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची मखलाशी करीत आहेत. उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्षच लबाडी करतात, तर गल्लीतील नेते त्यांचेच अनुकरण करणार ना. फुकटचे श्रेय लाटणाऱ्यांच्या या राष्ट्रवाद्यांना आता म्हणावे तरी काय. राष्ट्रवादी कसले हे तर फुकटचे श्रेय लाटी.

अर्थात, श्रेय उपटण्याची यांची ही खोड खूप जुनी आहे. म्हणजे पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे आणि मुंबईतील ५२ उड्डाणपूल करण्याचे श्रेय शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गस्थ झाले. मात्र, युतीनंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी आपण स्वतःच हे सारे उभे केले, अशाच आविर्भावात त्याची उद्घाटने करण्यास प्रारंभ केला. अशी ही राष्ट्रवादी काँग्रेसची फुकटचे श्रेय उपटण्याची परंपरा खूप जुनी आहे. निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय इतकंच.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यातील काही रस्त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्वतःला तालुक्याचे भाग्यविधाते म्हणवून घेणाऱ्या मात्र, प्रत्यक्षात लोकसभेच्या रणांगणातून पळ काढलेल्या दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभे बुद्रुक ते बोरघरपर्यंतचा पंधरा किलोमीटर लांबीचा आहुपे रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. एकूण निधीची तरतूद आहे ६७६.९४ लाख रुपये. त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील कवठे ते गांजेवाडी रस्ता तसेच गांजेवाडी, हिलालवाडी, इनामवस्ती ते माळीमळा या साधारण साडेसात किलोमीटरच्या रस्त्याचे काम देखील याच योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे. ४४१.७४ लक्ष रुपये खर्चाची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष महोदय सर्वात पुढे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणतात, ते खरंच आहे. विधानसभा अध्यक्षांवरच हक्कभंग दाखल केला पाहिजे. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता तो हक्कभंग नक्कीच दाखल करेल, याचा मला विश्वास आहे.

फुकटचं श्रेय लाटण्याची लागण झालेले दुसरे म्हणजे जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके. हे देखील राष्ट्रवादीचेच. या महोदयांची तर कमालच आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील १९ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दहा रस्त्यांची कामे माझ्याच निधीतून होत आहेत, असा दावा हे महाशय करत आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा निधी यांना मिळालाच कसा, याचे स्पष्टीकरण हे आमदार महाशय देऊ शकतील काय? कारण ही योजना फक्त खासदारांमार्फतच राबविली जाते. जांभुळशी ते काठेवाडी, सितेवाडी, कवठेवाडी ते राज्यमार्ग ५२, हिवरेतर्फे मिऱ्हेर ते राळेगण, इंगळूण ते पिंपरवाडी, ढेगळेवाडी, सुकाळवेढे, खामगाव ते मांगनेवाडी, आंबेगव्हाण ते ठाकरवाडी आणि इतर मिळून एकूण दहा रस्त्यांची कामं पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाली आहेत. तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा धंदा सोडून द्यावा.

Image

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळी इतकी निलाजरी आणि निर्ढावलेली आहेत, की विचारता सोय नाही. राज्य सरकार आणि पुणे जिल्हा परिषदेने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाला चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे राज्याला ग्रामविकास मंत्रालयांतर्गत निधीच मिळू शकला नव्हता. मग मी तत्कालीन ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन परिस्थितीचा खुलासा केला. किमान आदिवासी भागासाठी स्वतंत्रपणे कार्यक्रम निश्चित करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री, आयएएस अधिकारी, ग्रामसडक योजनेचे दिल्लीतील अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रव्यवहार आणि गाठीभेटी करून अधिकाधिक निधी मंजूर व्हावा, यासाठी तीन-चार वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या आदिवासी विभागाच्या शेड्युल पाच अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ३५४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यांसाठी ४० ते ५० कोटी रुपये मंजूर झाले. त्यासाठी मी प्रयत्न केला होता. जुन्नरचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष महोदय तेव्हा आपण कुठे गायब झाला होता.

काय हो कोणी सुरू केली ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. भारताचे तत्कालीन पंतप्रधान आणि लाडके नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी २००० साली या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी या योजनेचा प्रारंभ झाला. ग्रामविकास मंत्रालयांतर्गत ही योजना राबविण्यात येते. एक हजार लोकवस्तीची गावं, आदिवासी पाडे, वनवासी क्षेत्र, वाळवंटी प्रदेश आणि डोंगरदऱ्यातील गावांपर्यंत रस्ते पोहोचावेत, या हेतूने अटलबिहारी वाजपेयी यांनी ही योजना सुरू केली. लोकसभा खासदारांच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. योजना इतकी प्रभावी आणि उत्तम पद्धतीने राबविण्यात आली, की संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारलाही ती योजना पुढे सुरूच ठेवावी लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच देशभरातील अनेक राजकारणी हे फुकटचे श्रेय लाटण्यात पटाईत आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा फायदा खासदारांऐवजी इतरच मंडळी घेत आहे, अशा अनेक तक्रारी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयापर्यंत पोहोचल्या. मग त्या मंत्रालयाने नवा आदेश तातडीने जारी केला. पंतप्रधान ग्रामसडक योजना यशस्वी करण्यामध्ये खासदारांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही गोष्टी त्या परिसरातील विद्यमान लोकसभा खासदाराच्या हस्तेच व्हायला हव्यात. निमंत्रण पत्रिका आणि जाहिरातींमध्ये खासदारांना अव्हेरून चालणार नाही. उद्घाटन खासदारांच्या हस्तेच झाले, हे सिद्ध करणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठविले पाहिजे, असा आदेशच मंत्रालयाने जारी केला. यामध्ये कुचराई झाल्यास केंद्राकडून विविध योजनांसाठी मिळणाऱ्या निधीवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. तेव्हा ही योजना खासदारांचीच आहे आणि इतरांनी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

Image

भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे अर्थतज्ज्ञ वगैरे आहेत. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला खरी चालना मिळाली. रस्ते जितके चांगले आणि खेड्यापाड्यापर्यंत तितके देशाचे भवितव्य उज्ज्वल हे लक्षात घेऊन त्यांनी रस्त्यांचे जाळे अधिक चांगल्या पद्धतीने कसे विणता येईल, याचा विचार केला. त्यातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या दोन योजनांचा जन्म झाला. एक म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि दुसरी म्हणजे सुवर्ण चतुष्कोन योजना. दोन्ही योजनांमध्ये देशभर उत्तम रस्ते निर्माण झाले. एकदा का उत्तम रस्ते निर्माण झाले, की मग वस्ती, वाहने, वाहतूक, व्यवहार आणि व्यापार या सर्व गोष्टींना वेग मिळतो. गती मिळते. पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

विषयाशी थेट नाही पण लांबून संबंध आहे, म्हणून सहज जाता जाता सांगतो. देशामध्ये सध्या राष्ट्रीय महामार्गांची जी लांबी आहे, त्यापैकी निम्मे रस्ते हे वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेले आहेत. हे मी सांगत नाहीये. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातच ही माहिती देण्यात आली आहे. १९८० मध्ये भारतात राष्ट्रीय महामार्गांची लांबी होती २९ हजार २३ किलोमीटर. त्यांचा विस्तार होऊन २०१२ मध्ये ते आता ७६ हजार ८१८ किमोमीटरपर्यंत गेले आहेत. त्यापैकी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत म्हणजे १९९७ ते २००२ या दरम्यान एकूण २३ हजार ८१४ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले. तीन दशकांमध्ये बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या निम्मे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षांमध्ये १६ हजार किलोमीटरपेक्षाही कमी लांबीचे रस्ते बांधले आहेत. आता बोला.

म्हणजे फ्लायओव्हर, रस्ते, एक्स्प्रेस वे झालेत वाजपेयी यांच्या दूरदृष्टीमुळे. भारतामध्ये मोबाइल खेड्यापाड्यात पोहोचले, ते प्रमोद महाजन यांच्यामुळे. म्हणजे वाजपेयी यांच्या कारकिर्दीतच. सर्व शिक्षा अभियान ही संकल्पना पण वाजपेयी यांच्या कारकिर्दीतच रुजली. पण काँग्रेस जाहिरातबाजी करून दावा करतंय, की आमच्याच कारकिर्दी म्हणजे गेल्या दहा वर्षांत मोबाईल क्रांती झाली. रस्ते, एक्स्प्रेस वे  नि फ्लायओव्हर झाले. गावागावांमध्ये पक्क्या शाळा वगैरे बांधल्या गेल्या. काय म्हणायचं दुसऱ्यांचं श्रेय लाटणाऱ्या या मंडळींना. राष्ट्रवादीची मंडळी तशीच आणि त्यांचे भाईबंद काँग्रेसवालेही तसेच.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता यथेच्छपणे उपभोगली. लोकांच्या कामांच्या नावाने ठणाणा. मात्र, निवडणूक आली की दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घ्यायला हे पुढे. नाहीतर लोक विचारणार बाबांनो, इतके वर्षे काय केलंत. मग ही मंडळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी केलेली कामे स्वतःच्या नावावर दाखविणार. स्वतः काहीच करायचे नाही आणि फक्त फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा. पाटील हे वागणं बरं नव्हं. आता माध्यमं जागरूक आहेत. सोशल मिडियाही सदैव जागा आहे. त्यामुळं जे केलंय तेवढ्याचंच बोला. इतरांचं श्रेय घ्यायला जाल, तर जोरदार आपटाल.