अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…

धन्यवाद… शतशः धन्यवाद…

धन्यवाद… त्रिवार धन्यवाद… शतशः धन्यवाद… गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आपल्या शिरूर मतदारसंघात यंदा मतदान साडेआठ ते नऊ टक्क्यांनी वाढले. भारताचे भविष्य सुरक्षित आणि समर्थ हातांमध्ये सोपविण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडून भरभरून मतदान केले, याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.

भारतीय लोकशाहीच्या अलिकडच्या इतिहासातील ‘आरपार’ची लढाई म्हणून चर्चेत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील आपल्याकडील मतदानाचा टप्पा पार पडला. आता वेध लागलेत सोळा मे चे. गेल्या दहा वर्षांतील मतदारसंघातील कामाचा धडाका, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी देशात असलेली लाट आणि वाढलेला मतदानाचा टक्का हे सर्व संकेत एकाच गोष्टीचे निदर्शक आहेत. मतदारांचे प्रेम, शुभेच्छा नि आशीर्वाद, शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेली मेहनत तसेच सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा यांच्या जोरावर यंदाही शिवसेनाच बाजी मारणार आणि हॅट्ट्रिक साधणार, यामध्ये आता मला अजिबात शंका नाही.

10006357_805351042828149_4900195435141979680_n

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या ना त्या निमित्ताने सगळीकडे हिंडणं-फिरणं होतं. दहा वर्षांपूर्वी खासदार झाल्यापासून तर पायाला भिंगरी लागल्यासारखाच हिंडतोय. त्यामुळं निवडणुकीच्या निमित्तानं हिंडणं हा काही माझ्यासाठी तसं पहायला गेलं तर वेगळा अनुभव नव्हता. तरीही  निवडणुकी  निमित्तानं प्रचारासाठी महिना दीड महिन्याच्या कालावधीत मतदारसंघ उभा-आडवा पालथा घालणं हा वेगळाच अनुभव असतो. या निवडणुकीच्या निमित्तानंही असेच काही अनुभव आले. ते तुम्हाला जरूर सांगावेसे वाटले, म्हणूनच हा ब्लॉग लिहितोय…

यंदा उन्हाळा बराच लवकर सुरू झाल्याचं प्रचारादरम्यान फिरताना जाणवलं. उन्हाचा कडाका आणि उन्हामुळं होणारी काहिली ही गेल्या दोन निवडणुकीपेक्षा खूपच अधिक होती, हे प्रकर्षानं अनुभवलं. सकाळी सहा वाजता माझा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री झोपायला कधी कधी रात्री दोन वाजायचे. चार तास झोप घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या दिवशी प्रचारासाठी तयार व्हावं लागायचं. तालुकानिहाय प्रचार यंत्रणा राबविली. त्यानुसारच प्रचाराचं प्लॅनिंग केलं. अनेकदा रोज चाळीस-चाळीस गावांमध्ये प्रचारासाठी जाणं व्हायचं. खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणं व्हायचं. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात गेल्यावर प्रचारसभा,मेळावे किंवा रोड शो व्हायचे. पण छोट्या गावांत गेल्यानंतर पायी फेरी मारायची, लोकांशी संवाद साधायचा आणि पुढं निघायचं, असं ठरलेलं असायचं.

मतदारसंघातील अगदी छोट्यातील छोट्या गावात, आदिवासी पाड्यात गेलो. कोणत्याही गावात गेलो, की मतदारांना भेटण्याची हक्काची जागा म्हणजे गावातलं मंदिर. मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि नंतर मग मंदिराच्या बाहेरच गावकऱ्यांशी संवाद साधायचा. गेल्या पाच वर्षांत गेलो नव्हतो, इतक्या मंदिरांमध्ये या दीड महिन्यात गेलोय. लोकांना पण बरं वाटायचं, आपला खासदार निवडणुकीच्या रणधुमाळीत वेळ काढून खास आपल्याला भेटायला आलाय याचं.

10256657_803992489630671_4767046410696233741_o

गावातल्या तरुणांना माझ्यासोबत फोटो काढायचा असायचा. फोटो काढून तो व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकावयाचा असायचा. ‘अब ऑटोग्राफ का नाही फोटोग्राफ का जमाना है..,’ असं कुठल्याशा जाहिरातीत पाहिल्याचं आठवतंय. त्याचा अनुभव मला जागोजागी येत होता. प्रत्येकाकडून दादा घरी या, दादा घरी या, अशी विनंती व्हायची. प्रत्येकाच्या घरी जाणं काही व्हायचं नाही. पण निवडून आल्यावर नक्की  येणार, असं आश्वासन देऊ मग आम्ही पुढं निघायचो. ‘दादा आता जेवूनच जायचं, दादा चहा तरी घ्या किंवा थंडगार सरबत घ्या,’  असा आग्रह प्रत्येकाकडून व्हायचा. खरं तर सगळेच मला घरच्यासारखे. त्यामुळंच घरच्यांचा आग्रह मोडणं अशक्य असायचं. पण प्रत्येकाची समजूत घालून मग तिथून पुढं निघावं लागायचं. क्वचित कुठंतरी घोटभर चहा घे, कुठं थोडं सरबत पी, उसाचा रस घे असं करत आमचा प्रवास पुढं सुरू असायचा.

गावात गेल्यानंतर आमच्या अनेक भगिनी या शिवाजीदादाला ओवाळण्यासाठी थांबलेल्या असायच्या. पोहोचल्यानंतर पटकन ओवाळून घ्यायचं आणि मग पुढं जायचं, असं ठरलेलं असायचं. पण अनेकदा गडबडीत त्यांच्याकडून ओवाळल्यानंतर डोक्यात तांदुळांच्या ऐवजी साखर टाकली जायची आणि साखर भरवायच्या ऐवजी त्या तांदूळ भरवायच्या. अशी मजा मजा चालायची प्रचारादरम्यान. पण आपल्याला ओवाळण्यासाठी भर उन्हात कोणतरी थांबलंय, हे पाहूनच मला खूप बरं वाटायचं. असं प्रेम सगळ्याच राजकारण्यांना मिळतो, असं नाही.

10258615_804454106251176_7277278779762166207_o

आमच्या गावात पाच मिनिटं तरी बोललं पाहिजे हं,  असा सगळ्याच ठिकाणी आग्रह असायचा. मी पण मग गावकऱ्यांचा आग्रह मोडायचो नाही. ‘दिल्लीत जाण्यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्या आहेत. आशीर्वाद घ्यायला आलो आहे,’ असं काहीसं बोलून मग तिथून पुढं निघायचो. दोन मिनिटं बोललं तरी गावकऱ्यांना बरं वाटायचं. दहा वर्षांत केलेल्या कामांची आठवण मतदार स्वतःहून करून द्यायचं. दादा तुमच्यामुळं आमच्या गावात रस्ता आला. तुमच्यामुळं आमच्या नदीवर पूल बांधला गेला… असं बरंच काही.

अनेक ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी वैयक्तिक कामांच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘दादा, तुम्हाला हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठी फोन केला होता. तुम्ही त्यावेळी आमच्यासाठी हॉस्पिटलला फोन केला आणि आमचं बिल कमी झालं. आता आम्ही तुमची साथ सोडणार नाही,’ असं एखादा गावकरी म्हणायचा. कुणी म्हणायचं, दादा तुमच्या शिफारसीमुळं सरकारी रुग्णालयात आमचं ऑपरेशन अगदी सहज झालं वगैरे वगैरे. एका गावात गेल्यानंतर नऊ-दहा तरुण माझ्यापाशी आले आणि म्हणाले, की दादा, मागं आम्ही दिल्लीत अडकून पडलो होतो. तेव्हा आम्ही तुमच्या दिल्लीतील बंगल्यावर राहिलो होतो. तेव्हा तुम्ही आमच्या राहण्यासह इतर सगळी व्यवस्था खूप चांगली केली होती. ती गोष्ट आमच्या खूप लक्षात राहिली आहे. आमची मते तुम्हालाच… मी मतदार राजाकडे मत मागायला जातोय आणि मतदार मला स्वतःहून सांगतोय, की दादा यंदा आमचं मत तुम्हालाच. मला सांगा, कोणत्याही लोकप्रतिनिधीला यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकेल.

10012783_793480607348526_1180859552_o

मतदारांप्रमाणेच मला आभार मानायचे आहेत, ते माझ्या कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे. माझ्या गावातील कार्यकर्ते असो, मतदारसंघातील शिवसैनिक असो किंवा मुंबईहून वीस-पंचवीस दिवसांसाठी माझ्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते असो. त्या सर्वांच्या जोरावरच आम्ही प्रचारयंत्रणा अत्यंत प्रभावीपणे राबवू शकलो. प्रचारात फिरताना अत्यंत अचूक प्लॅनिंग असो, पुढील व्यवस्था योग्य पद्धतीनं लागलेली आहे किंवा नाही हे तपासून पाहणं असो, गोळ्या-औषधं मी वेळेवर घेतोय की नाही यावर लक्ष ठेवणं असो… अशी अनेक छोटी-मोठी काम कार्यकर्त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली, त्यामुळंच आम्ही मतदारसंघात सर्वदूर पोहोचू शकलो. आमचं नियोजन फारसं कधी चुकलं नाही. उशीर झालाच तर पंधरा-वीस मिनिटांचा. पण पोहोचायलाच दोन-तीन तास उशीर झाला, असं फारसं कधी घडलं नाही. ते याच अचूक आणि शिस्तबद्ध प्लॅनिंगमुळं.नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाचं नाव इथं घेणं शक्य नसलं तरीही मी त्यांचे योगदान जाणतो आणि मला त्या सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत आहे.

माझ्या प्रचारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच माझं बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या मंडळींचाही मला इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आमचा बबलू काजळे असेल, दत्ता गांजाळे, सुजीत देशमुख, सुशांत जाधव, संतोष गावडे, नाना गांजाळे, सागर काजळे आणि प्रकाश थोरात ही मंडळी असतील किंवा प्रमोद सावंत असतील, या सात-आठ जणांवर मी माझं ऑफिस सोपवून निर्धास्तपणे प्रचारासाठी बाहेर पडायचो. माझ्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येकाला समाधान मिळेल आणि त्याचं काम पूर्ण होईल, यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असायची. कामासाठी आलेला माणूस रिकाम्या हातानं आणि हिरमुसल्या मनानं परत जाणार नाही, याची काळजी हे घेत असत. दौऱ्याच्या बातम्या वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविणं, त्याचा फॉलोअप घेणं, निवडणूक आयोगाच्या संपर्कात राहणं, खर्चाचे हिशेब-परवानग्या आणि अशा असंख्य गोष्टींचा पाठपुरावा करणं अशी शेकडो कामं ही मंडळी निर्विघ्नपणे पार पाडत होती, म्हणूनच मला कशाचंही टेन्शन नव्हतं.

आणखी काही जणांना विसरून चालणार नाही. ते म्हणजे माझे कुटंबीय आणि नातेवाईक. ही मंडळी देखील माझ्या प्रचारात पहिल्यापासूनच हिरिरीने सहभागी झाली होतीच. पण गेली दहा वर्षे त्यांनी मला जे सांभाळून घेतलंय, त्याबद्दल मला त्यांचं कौतुक वाटतं. मतदारसंघात फिरताना कधीकधी घराकडं, संसाराकडं दुर्लक्ष होतं. पण त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही किंवा चुकूनही एखादा शब्द देखील काढला नाही.

मतदारसंघातील मतदार, माझे शिवसैनिक, कुटुंबीय त्याचप्रमाणे माझ्या गावातील दीडशे ते दोनशे लोकं, विविध गावातील गावकरी, माझे नातेवाईक आणि खेड्यापाड्यातील सर्वसामान्य माणसं फक्त माझ्या प्रचारासाठी आणि विजयासाठी सतत एक महिना संपूर्ण मतदारसंघ फिरत होते. त्या सर्वांच्या जोरावरच माझी आजवरची वाटचाल सुरू होती आणि ही घोडदौड यापुढेही कायम राहील, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद.

जय महाराष्ट्र…

वाघ एकला राजा…

DSC_0002

मतदार बंधू-भगिनींनो नमस्कार…

भारतीय लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेला मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. त्या दिवशी योग्य माणूस निवडायला चुकलात, तर मग पुढील पाच वर्षे मनस्ताप करत बसण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळेच सारासार विचार करून योग्य उमेदवारालाच मतदान करा आणि कोणत्याही प्रलोभनांना आणि धमक्यांना नि दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करा.

निवडणुकीच्या वेळी लोक तुमच्या गावात येतील, घरात येतील. हात जोडून मतांचा जोगवा मागतील. निवडणूक जवळ आली, की उगवणारे कोण आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून घरातल्या माणसाप्रमाणे सदैव तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस कोण?याचा विचार करा आणि मगच बटण दाबा.

तुम्ही बघताच आहात. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना एकटाच झुंज देतोय. सगळ्यांना एकटा पुरून उरतोय. मतदारसंघात सहापैकी पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे. केंद्र आणि राज्याप्रमाणाचे जिल्हा परिषदेतही सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची. प्रशासन आणि पोलिस देखील सत्ताधाऱ्यांनाच सामील असलेले. वेळोवेळी माझी आणि माझ्या पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा आणि कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो. विकासकामांचा निधी अडवून ठेव, कधी खोटी माहिती देऊन योजनेची अंमलबजावणीच रद्द कर, मी एखाद्या योजनेसाठी मागितलेला निधी दुसरीकडेच वळव, कधी मी केलेल्या कामांचे उद्घाटन स्वतःच करून खोटा प्रचार कर… असे अनेक मार्ग अवलंबून ही मंडळी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात.

राष्ट्रवादीने तर मला पराभूत करण्यासाठी नेत्यांची आख्खी फौजच्या फौजच शिरूरमध्ये उतरविली आहे. शरद पवार ठाण मांडून आहेत. अजित पवारांनी तर मला पराभूत करण्याचा विडाच उचलला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यासंत्र्यांपासून ते गल्लीबोळातील पदाधिकाऱ्यापर्यंत जो उठतोय तो माझ्या विरोधात बोलतोय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी फर्ड्या इंग्रजीतून बोलणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला ‘तुमचं शिक्षण किती,’ असा प्रश्न विचारला जातोय. घर, संसार आणि उद्योगधंद्याकडं दुर्लक्ष करून माझ्या मतदारसंघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि मला विचारत आहेत, तुम्ही दहा वर्षात काय काम केलं. इतके सगळे आरोप करूनही मी जुमानत नाही, म्हटल्यावर मग आमच्याच काही लोकांना फितवून, फूस लावून आणि पैसे देऊन माझ्याविरोधात लढण्यासाठी उतरविण्यापर्यंत यांची मजल गेली.

10010661_805244569505463_4827094739406973192_o

महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे मला घेरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखलीय. पण मला हे चक्रव्यूह कसं भेदायचं हे मला माहितीय. नुसतं माहितीच नाही, तर मी राष्ट्रवादीचे हे चक्रव्यूह भेदणार आणि पुन्हा विजयी होणार, असा मला विश्वास आहे. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांविरोधात लढा देऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पाच आमदारांविरोधात लढून त्यांना कायमचा धडा मी शिकविणार आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, दहा वर्षांत रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. विकासकामांचा पैसा लाटला नाही. लोकांच्या कामांमध्ये कमिशन खाल्लं नाही. माझा दारूचा धंदा नाही. जुगाराचा आणि मटक्याच्या धंद्यात मी भागीदार नाही. वाळू उपश्याचा धंदा करून पैसे लाटलेले नाही. कधी कोणाला नाडला नाही, की कोणाकडून पैसा उकळला नाही. वाटमाऱ्या करून कधी आपापसांत वाटून घेतले नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीवाले मला घाबरत आहेत. कारण त्यांना माझ्याकडून काहीच वाटा मिळत नाही. भविष्यात आणखी डोईजड होईल म्हणूनच त्यांना स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक प्रतिमेचा शिवाजी नको आहे.

पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कितीही अपशकुन केला, तरी मी निवडून येणारच याची मला खात्री आहे. कारण मी गेली पंधरा-वीस वर्षे लोकांमध्येच वावरलो. माझ्याकडे येईल त्याचे काम प्रामाणिकपणे आणि लवकरात लवकर कसे उरकता येईल, याचा प्रयत्न केला. विकासकामांना प्राधान्य दिले. जात, पात, धर्म आणि पक्ष यापैकी काहीच पाहिले नाही. गावागावांत, खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांमध्ये गेलो. त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुखाचे दिवस दाखविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मतदार बंधू-भगिनी आणि तरुण-तरुणी माझ्या पाठिशी आहेत.

त्यामुळेच मला राष्ट्रवादीच्या या चक्रव्यूहाची भीती नाही. मी बिनधास्त आहे. अरे, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेचा मी खासदार आहे. सच्चा शिवसैनिक आहे. टोळकं करून येणाऱ्या कोल्हे, लांडगे आणि तरसांना मी घाबरत नाही. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ आहे वाघ. आडवे याल तर खबरदार..

1897674_10151935527787030_807607086160904921_n

आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट, दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचे सहकार्य आणि शुभेच्छा, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांचे शुभाशिर्वाद नि तरूण मतदार बंधू-भगिनींच्या शुभेच्छा यांच्या जोरावर माझी वाटचाल सुरू आहे. यंदाही ती सुरूच राहणार. आता तर केंद्रात आणि पुढे राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करून विकासाच्या आणखी योजना राबविण्यासाठी मी सज्ज आहे.

तुमच्या पाठिंब्यामुळेच माझी आजवरची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या सतरा एप्रिलला तुम्ही धनुष्यबाणाच्या समोरील बटण दाबून मला एक नंबरच्या मताधिक्याने विजयी कराल, अशी खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही असेच माझ्यासोबत रहा. कारण तुम्ही सोबत असाल तर राष्ट्रवादी नि काँग्रेसने माझी कितीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला, चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न केला, तरी मी त्यातून मी विजयश्री खेचून वीरासारखा बाहेर पडेन, असा मला आत्मविश्वास आहे.

नवी दिल्लीवर भगवा फडकविण्याचे दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करूया… दिल्ली जिंकूया… गुरूवार दिनांक १७ एप्रिल रोजी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून आपण नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मला प्रचंड बहुमताने विजयी कराल, असा मला विश्वसा आहे…

धन्यवाद.

भगव्या झेंड्याची शान… धनुष्यबाण

जय हिंद… जय महाराष्ट्र…

एक नंबरचं मत…एक नंबरचं लीड

झालं आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलीय. बरोबर आठवडाभरानं प्रचाराचा धुरळा उडणं थांबेल आणि मतदानाची १७ एप्रिल ही तारीख उजाडेल. यंदाच्या वे‍ळीही आपला एक नंबरच आहे. त्यामुळं एक नंबरच्या उमेदवारासमोरचं बटण दाबून एक नंबरच्या लीडनं मला निवडून द्यायचं आहे, असं आवाहन मी आपणा सर्वांना करतोय. एक नंबरचं बटण म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण. भगव्याची राखतो शान, शिवसेनेचा धनुष्यबाण.

गेल्या निवडणुकीत मला आपण सर्वांनी पावणेदोन लाखांहून अधिक मतांनी निवडून दिलं. भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पाडाव केला होता. यंदा आपल्याला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्यानं विजय मिळवायचा आहे. अर्थातच, आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद यांच्या जोरावर हे शक्य होऊ शकेल, असा मला विश्वास आहे. गेली दहा वर्ष फक्त मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फिरतोय. दिवस-रात्र न पाहता खेडोपाड्यांमध्ये मतदारांच्या गाठीभेठी घेण्यासाठी हिंडतोय. आदिवासी जनतेशी संवाद साधतोय. दहा वर्षांत वेळप्रसंगी संसाराकडं दुर्लक्ष केलं. उद्योगधंद्याऐवजी माझ्या मतदारसंघाला आणि विकासकामांना प्राधान्य दिलं. माझा मतदारसंघ अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणं जपला. त्यामुळंच यंदाच्या निवडणुकीतही आपण मला भरघोस मतांनी निवडून द्याल, अशी खात्री आहे.

Image

माझं इतकं काम आहे, जनसंपर्क आहे म्हणून तर माझ्या विरोधात लढायला राष्ट्रवादीचा एकही आमदार तयार झाला नाही. कुणाच्या पोटात दुखायला लागलं, दुसऱ्याच्या छातीत कळ आली तर कुणाचं डोकं दुखू लागलं. माझ्याविरूद्ध लढायला कोणीच तयार होईना म्हणून मग दिलाय कोणीतरी उमेदवार राष्ट्रवादीनं. म्हणजे कारखान्याचा अध्यक्ष. अरे, मी उभा केलाय तो कारखाना. कारखान्याची उभारणी होत होती, तेव्हा तेव्हा मी तन, मन आणि धन खर्चून तिथं टिच्चून उभा होतो. प्रसंगी माझ्या खिशातला पैसा खर्च करून कारखाना चालू करण्यासाटी झटलो. मागं पुढं पाहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा मी कारखान्याचा राजीनामा दिला. जो कारखाना मी माझ्या हातानं आणि मेहनतीनं उभा केला होता, त्याचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. नैतिकता पाळली.

Image

मध्यंतरी एका पक्षाचे नेते आले होते. म्हणे, शिवनेरीसाठी खासदारांनी काय केल? कधी प्रश्न उपस्थित केला का वगैरे वगैरे… बरंच काही बोलले. काय बोलणार आता लोकांबद्दल. बाकी सगळं सांगत बसत नाही. ते यापूर्वीही सांगितलंय. लिहिलंय. फक्त शिवनेरीच्या विकासाचा प्रश्न विचारलात ना त्याचंच सांगतो. २००७ मध्ये विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खासदारांची बैठक बोलाविली होती. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील कोणते प्रश्न आवर्जून मांडले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी ती बैठक होती. २००७ मध्येच विलासराव देशमुख यांना पत्र दिलं होतं. जुन्नर तालुक्यातील नारायणगड, शिवनेरी, हरिश्चंद्रगड आणि हडसर या चार किल्ल्यांचे संवर्धन करण्याच प्लॅनच त्या पत्रामध्ये होता. चारही गडांचे क्लस्टर करून मग त्याचा विकास करावा आणि पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर त्याचे मार्केटिंग करण्यात यावे, अशी योजना दिली होती. पुढे काय झाले ते तुम्हीच सरकारला विचारा. लोकसभेत मुद्द्यावर वेळो‍वेळी आवाज उठविला. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पण पुढे सरकायला तयारच नाही. आता काय बोलणार या मंडळींना.

आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आल्यानंतर हे सारे प्रश्न प्राधान्याने सोडवून टाकू. सरकारमधली यांचीच मंडळी कोंडी करतात. विरोधकांच्या मतदारसंघातील विकास रोखून ठेवतात आणि त्यांचे गल्लीतील नेते काय विकास केला, काय विकास केला असे विचारतात. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा हा दुटप्पीपणा आहे. त्याचा पर्दाफाश मी वेळोवेळी करतच राहीन.

Image

तुम्हाला जर चर्चा करण्याची एवढीच इच्छा असेल, तर मग एखाद्या जाहीर सभेत येऊ आमनेसामने. मी काय विकास केला, ते कागदपत्रांसह आणि पुराव्यांसह मांडतो. नि तुम्ही तुम्ही केलेल्या कामांची जंत्री घेऊन या. होऊ दे जनतेसमोर खरं खोटं काय आहे ते. बोला काय करायचं यायचं का आमनेसामने. मी शिवसेनेचा छोकरा आहे. कुणाला घाबरणारा नाही. मागे हटणार नाही. लढत राहणार. झुंज देत राहणार.

पुढील पाच वर्षांतील लक्षवेधी…

१)      पुण्यातील ससून हॉस्पिटलप्रमाणे किंवा मुंबईतील केईएम हॉस्पिटलप्रमाणे ग्रामीण भागासाठी आपल्या मतदारसंघात भव्य सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करणार. जेणेकरून स्वस्त उपचारांसाठी पुण्यामध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये. अत्यंत माफक दरात आणि चांगल्या पद्धतीने उपचारांची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल, याकडे लक्ष असेल.

२)      पुणे-नाशिक रेल्वेमार्ग. पुण्याहून नाशिकला जाणारा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्याचे काम सुरू होईन जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील असेन. पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी १८३९ कोटी रुपयांचा निधी २०१२ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण नियोजन आयोगाकडे प्रलंबित असून त्यांच्या मान्यतेनंतर पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला गती येईल.

३)      दाऱ्याघाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी माझे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात सत्ता आल्यानंतर त्याला आणखी गती मिळेल. २००४ मध्ये निवडून आल्यानंतर सर्वप्रथम फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबरोबर दाऱ्याघाट हवाच म्हणून पाच बैठका घेतल्या. गेल्या तीन वर्षांपासून महसूल आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरूच आहेत. बोगदा काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभागाला पत्र दिले आहे. पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाला गती मिळेल. दाऱ्याघाटाची निर्मिती करताना साधारण फॉरेस्टची १९ ते २० एकर जमीन वापरली जाणार आहे. त्याबदल्यात त्यांना ४० एक जमीन देऊ, असे आश्वासन देणारे पत्र महसूल विभागाने फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिले तर प्रकल्प मार्गस्थ होईल. मात्र, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हे प्रकरण अडकले आहे. मात्र, आपले सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळेल आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे.

४)      आदिवासी भागासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी अधिक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आदिवासी भागातील समस्या सोडविण्यासाठी काय करताय येईल, यासंदर्भात मा. नरेंद्र मोदी आणि माझी चर्चाही झाली आहे. त्यांच्या आणि माझ्या कल्पना कशा पद्धतीने राबविता येतील, यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.

५)      बेरोजगार आणि स्थानिक युवकांना कशा पद्धतीने एमआयडीसीमध्ये सामावून घेता येईल, त्यांच्यासाठी अधिकाधिक उद्योगधंदे कसे आणता येतील, यावरही माझा भर असणार आहे. खेड, आंबेगाव आणि जुन्नरच्या पट्ट्यात ‘फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ची संकल्पना कशा पद्धतीने रुजविता येईल आणि त्यामध्ये स्थानिक तरुणांना कसे सामावून घेता येईल, यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी आणि उठाव असल्यामुळे ती संकल्पना माझ्या भागात कशी रुजविता येईल, हे मी पाहणार आहे.

६)      माझ्या मतदारसंघात धरणग्रस्तांचे प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत. दहा वर्षांत मी त्याकडे जातीने लक्ष दिले आहेच. मात्र, पुढील पाच वर्षांतही ते सोडविण्यासाठी केंद्रीय स्तरावरून कशा पद्धतीने प्रयत्न होतील, याकडे मी लक्ष देणार आहे. खुद्द मा. नरेंद्र मोदी यांनीही या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे सूतोवाच केले आहे.

जय महाराष्ट्र…

(‘एकदिवस उमेदवारासमवेत…’  या मालिकेअंतर्गत लोकसत्ताचे ऑनलाइन एडिशनचे प्रमुख श्री. विश्वनाथ गरूड यांनी केलेले वार्तांकन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

Image

प्रचारादरम्यानची ‘डब्बा पार्टी’

प्रचारादरम्यान अनेकदा गावोगावी फिरावं लागतं. सकाळपासून सुरू होणाऱ्या प्रचारफेऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात. मध्येच एखाद्या गावात कार्यकर्त्यांचा मेळावा लावलेला असतो. दुसऱ्या गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक असते. अशा धामधुमीत उगवलेला दिवस कसा मावळतो, ते कळत देखील नाही. अशा अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून चार घास खाण्यासाठी पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढणं देखील अनेकदा कठीण होऊन जातं. मग कुठं जेवायचं नि काय जेवायंच, याचं नियोजन वगैरे करणं तर खूपच दूरची गोष्ट झाली.

1970589_791342254229028_493614527_n

मध्यंतरी फेसबुकवर प्रचारादरम्यानच्या ‘डब्बा पार्टी’चे फोटो पडल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांना त्या फोटोचं अप्रूप वाटलं. काही जणांनी मला फोन करून त्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. एखादा खासदार त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बसून त्यांच्या डब्यातलं जेवण करतो, याचं काही मंडळींना खूपच आश्चर्य वाटलं. ‘दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे,’ ‘तुम्ही ग्रेट आहात,’ असं अनेकांनी सांगितलं. पण मी इथं नम्रपणे सांगू इच्छितो, मी खूप वेगळं किंवा मोठं असं काहीच केलेलं नाहीये. इतर नेते त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर जेवत नसतील, म्हणून तुम्हाला हे वेगळं वाटत असेल. पण मी हे नेहमीच करत आलोय.

गेल्या दहा-वीस वर्षांपास्नंच माझं असंच आहे. आता फक्त फेसबुक किंवा ब्लॉग वगैरे सोशल मिडिया आल्यामुळं या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायेत इतकंच. लहानपणी नाही का, शाळेमधली मुलं एकत्रच डब्बा खायला बसतात. त्यांच्यामध्ये कुठं दुजाभाव असतो. अनेकदा सहलीला गेलं किंवा कुठल्याशा किल्ल्यावर भटकायला गेल्यानंतर सगळे जण एकत्रच अंगत पंगत मांडतात. ती मंडळी जसं एकत्र जेवतात, तसंच आमचं कार्यकर्त्यांचं सहभोजन. मुख्य म्हणजे जेवणाच्या बाबतीत माझ्या फारशा अटी आणि शर्ती कधीच नव्हत्या. आजही नाहीत. ‘जे ताटात पडेल, ते गपगुमान खायचं. जास्त नखरे करायचे नाहीत,’ असं वळण लहानपणापास्नंच आईनं लावलंय. त्याचा आजपर्यंत खूप फायदा मला झाला आणि अजूनही होतोय.

प्रचारादरम्यान पंधरा-वीस मिनिटं वेळ आहे, असं लक्षात आल्यानंतर थोड्या वेळेसाठी डेरा टाकायचा. एखाद्या रस्त्याच्या कडेला झाडाची सावली शोधायची, मंदिराची ओसरी गाठायची किंवा शेताचा आसरा घेऊन डब्बे उघडायचे आणि ताव मारायचा. तालुक्याच्या ठिकाणी असलो तर कार्यकर्त्याच्या घरामध्ये किंवा ऑफिसात जेवण उरकायचं, हा आमचा नित्यक्रम. मध्यंतरी जुन्नरला अशीच आमची जोरदार ‘डब्बा पार्टी’ पार पडली. प्रचारादरम्यान अधूनमधून अशा डब्बा पार्ट्या पार पडतच असतात. कधी भजीपावचा आस्वाद घेतला जातो. तर कधी गर्रमागर्रम वडापावची छोटेखानी पार्टी रंगते.

10001160_792453944117859_1764211819_o

कधी ज्वारीची तर कधी बाजरीची भाकरी, ठेचा किंवा शेंगादाण्याची चटणी, वांग्याची भाजी किंवा झणझणीत झुणका, कधी लाल तर्रीचं कालवण, फ्लॉवर नि बटाट्याचा रस्सा आणि भात. प्रत्येकाच्या डब्यात जे काही असेल ते सर्वांनी एकत्र बसून फस्त करायचं… कधीतरी हळूच कोणीतरी स्वतःच्या डब्यातली भाकरी मला देतं आणि आग्रह करत म्हणतं, ‘दादा, तुम्ही खा. आपल्याला अजून खूप फिरायचंय.’ कधी मी माझ्याकडची भाकरी-भाजी कार्यकर्त्यांना देत म्हणतो, ‘तुमचं जोरात होऊ द्या. तुम्हाला पण जोरदार काम करायचंय.’ थट्टामस्करी करत आमचं जेवण पार पडतं. सहकाऱ्यांसोबत जेवण्यात जे काही सुख आहे, ते शब्दात मांडणं खूप अवघड आहे. घाईघाईत का होईना पण दोन घास पोटात जातात, यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असणार.

प्रचारासाठी फिरताना एखाद्या दूरच्या खेड्यात गेल्यानंतर रात्री परतायला उशीरच होतो. मग गावातली एखादी मायमाऊली तिच्या लेकराला आग्रह करते. म्हणते, ‘शिवाजी, आता कधी तू घरी जाणार आणि कधी जेवणार. बाहेर काहीबाही खाण्यापेक्षा आमच्याकडंच भाजीभाकरी खाऊन मग जा.’ खेड्यातल्या कुठल्याशा घरातून ‘दादा, आज जेवण केल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणारच नाही,’ असा आग्रह होतो. माझ्या परिवाराचा भाग असलेल्या मंडळींचा हा प्रेमळ आग्रह मला मोडवत नाही. मग रात्रीचं जेवण तिथंच होतं.

Tea

मध्यंतरी खेडतालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील रस्ते डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. तसंच आळंदी, कोयाळी, मरकळ या ठिकाणी ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामांचा नारळही फोडण्यात आला. कामाची ही सगळी गडबड सुरू असतानाच एका शिवसैनिकाच्या घरातून ‘दादा, आज इथंच जेवायचं,’ असा आग्रह सुरू झाला. छोटीशी चिमुरडी देखील त्यात पुढं होती. त्या चिमुरडीचा आग्रह मला मोडवेना. मग ‘जेवण नको, फक्कड चहा टाका,’ असं सांगून आमची छोटेखानी ‘टी पार्टी’ पार पडली. त्यांच्याकडं चहा घेतल्यानंतर त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता.

काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातल्या आळे इथं आठवडे बाजाराला भेट दिली. तिथल्या बाजारात शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांशी मस्त गप्पागोष्टी झाल्या. त्यांनी आणलेल्या भाज्या, फळं आणि इतर गोष्टींबद्दल मी माहिती जाणून घेतली. विक्रीसाठी आणलेली काही फळं त्यांनी मला दिली. ‘दादांनीही त्याच्या तरुणपणात माझ्यासारखीच भाजीची पाटी वाहिलीय, भाजी विकलीय, ही गोष्ट आम्हाला खूपच अभिमानाची वाटते,’ असं त्या भाजीविक्रेत्यांनी स्वतःहून मला सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर दोन क्षण माझा भूतकाळ उभा राहिला. त्यावेळी घेतलेल्या कष्टांची आठवण झाली.

1511463_796064123756841_887596997_o

लहानपणी आठवडे बाजार आणि जत्रा या दोन गोष्टींचं मला खूप आकर्षण असायचं. त्याठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळं आम्ही कायमच जत्रेची वाट पाहत असायचो. रेवड्या, गोडीशेव, शेव-चिवडा, बुंदीचा लाडू, पापडी, वडा आणि भजी वगैरे गोष्टी खुणावत असायच्या. परवा आळे बाजारात गेल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ‘दादा, तुम्हीच येणार. आताच तोंड गोड करतो,’ असं म्हणत कुणी मिठाई भरविली तर कुणी गोड्याशेवेचा आग्रह केला. प्रत्येकाच्या मनात त्याच्या शिवाजीदादाबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी पाहून मलाही भरून आलं.

गेली अनेक वर्ष मी समाजकारणात आहे. दहा वर्ष खासदार आहे. पण मी नेता, हा कार्यकर्ता वगैरे गोष्टी मी कधी मानल्याच नाहीत. कार्यकर्त्यांसमवेत फिरलो, कार्यकर्त्यांसमवेत बसलो, त्यांच्यासोबतच जेवलो आणि त्यांच्यासोबतच राहिलो. शिवसैनिक हाच माझा सखा आणि खेडोपाड्यातला मतदार हाच माझा सोबती. त्यामुळं माझं जे काही आहे, ते त्यांच्यासमोर. त्यांच्यासोबत. आतून एक आणि बाहेरून एक असं मला कधी जमलंच नाही. म्हणूनच कदाचित माझं आणि शिवसैनिकांचं नातं एकदम वेगळं आहे.

‘जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत जेवता, तेव्हा त्या जेवणाची लज्जत नेहमीपेक्षा आणखी वाढते,’ अशा आशयाचा इंग्रजीमध्ये एक विचार आहे. माझे शिवसैनिक, माझे कार्यकर्ते हे माझं कुटुंबच आहे. त्यांच्यासमवेत जेवण घेतल्यानं जेवणाची लज्जत, पदार्थांचा स्वाद आणखी वाढतो, असंच मला वाटतं. कारण वेळोवेळी मी त्याचा अनुभव घेतलाय.